हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येची तयारी; खंडणी विरोधी पथकाची कारवाई
अंबरनाथ येथील एका हॉटेल व्यावसायिकाची खंडणीसाठी हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड सुरेश पुजारी टोळीच्या चार गुंडांच्या ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील व्यावसायिकांची सविस्तर रेकी करून त्यांची माहिती सुरेश पुजारीला पुरविण्याचे काम हे चौघे करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच यापैकी दोघांनी उल्हासनगर येथील केबल व्यावसायिक सचानंद करिरा यांची हत्या करण्यापूर्वी त्याच्या कार्यालयाची टेहळणी करण्याचे काम केल्याचेही समोर आले आहे.
धर्मेश देवराज गौडा ऊर्फ दीपक (३१), रोहित राजेश पटेल (२५), नितीन मधुकर पराडकर (४२) आणि आनंद सुरेश रेड्डी (३०) अशी चौघांची नावे आहेत. यापैकी रोहित हा सराईत गुन्हेगार आहे. धर्मेश, रोहित आणि आनंद हे तिघे कॅटरिंगचे काम करतात तर नितीन हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. गेल्या काही महिन्यांपासून हे कुख्यात गुंड सुरेश पुजारी टोळीसाठी काम करीत आहेत. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या मोठमोठय़ा व्यावसायिकांवर नजर ठेवून त्यांची संपुर्ण माहिती सुरेश पुजारीला पुरवायचे काम चौघे करीत होते. सप्टेंबर महिन्यात उल्हासनगर येथील केबल व्यावसायिक सचानंद करिरा यांची खंडणीसाठी हत्या झाली होती. सुरेश पुजारीच्या इशाऱ्यावरून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने या टोळीतील नितीन अवघडे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून हे सर्वजण सध्या ठाणे कारागृहात आहेत.
या कारवाईनंतरही अंबरनाथ येथील एका हॉटेल व्यावसायिकाला ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते. कारागृहातील साथीदारांच्या सुटकेसाठी पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी खंडणीची रक्कम कमी करून पाच लाखांवर आणली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाचा समांतर तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाने सुरू केला होता. या तपासादरम्यान पथकाने या चौघांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh pujari gang four gangster arrested by police