प्रेमाला कशाचंच बंधन नसतं. स्थळ, काळ, वेळ, वय अशा कशाच्याही सीमा प्रेम मानतच नाही. प्रेम ही भावना एवढी विशाल असते की ती शारीर आकर्षणापलीकडची भावना असते. मग त्याला कशाचंच बंधन राहत नाही.
फोटोमधले हे दोन प्रेमी बघा. दोघंही व्हीलचेअरला बांधले गेलेले. दोघंही एकाच कार अॅक्सिडंटमध्ये सापडलेले. तो कार अॅक्सिडंटही नवी मुंबईत झालेला. दोघांच्याही अॅक्सिडंटला कारणीभूत ठरणारी कार एकच. पण नाही म्हणायला दोघांचेही अपघात तीन वर्षांच्या अंतराने झालेले.
नियतीच्या क्रूरपणात सापडलेले हे दोघे जीव परिस्थितीमुळे एकत्र आले ते एकमेकांना आधार द्यायला. एकमेकांच्या आधाराने त्यांनी आपलं आयुष्य शक्य तेवढं पूर्वपदावर आणलं.
तेवढ्यातच तिला २० दिवसांसाठी युरोपला जावं लागलं. आणि त्यावेळेला दोघांनाही तीव्रतेने जाणवलं की आपण एकमेकांविना राहू शकत नाही. ती आठवड्यातून एकदा त्याला आयएसडी काॅल करायची पण ते पुरेसं नव्हतं. ती भारतात परत आल्यावर या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी गंभीरतेने विचार करायला सुरूवात केली आणि एकमेकांचे जन्माचे जोडीदार होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी डेटिंगही केलं. ते दोघे सिनेमालाही गेले. आणि प्रत्येक डेट नंतर त्यांचा लग्न करायचा निर्णय पक्का होत गेला
मियाँ बीवी राजी झाल्यावर आपापल्या घरच्याची परवानगी मिळवण हे आणखी कठीण काम. “दोघांपैकी एकजण तरी धडधाकट हवं” या विचारातून दोघांच्याही घरून लग्नाला परवानगी मिळत नव्हती. पण या दोघांचं प्रेम पाहत त्यांनीही शेवटी नमतं घेतलं.
‘त्याची’ आणि ‘तिची’ कहाणी फेसबुकवर तुफान व्हायरल झाली आहे. वाचा सगळ्याच्या पार जाणारी या दोघांची ही प्रेमकहाणी