भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर गप्पा माराव्यात- त्यांना आपल्या आयुष्याबाबतच्या शंका विचाराव्यात.. त्यांची मते जाणून घ्यावीत.. त्यांच्या सहवासात काही वेळ व्यतित करावा, असे अनेकांना- विशेषत: युवकांना वाटत असते. पण ज्या व्यक्ती डॉ. कलाम यांच्या सहवासात असतात- त्यांच्याशी दररोज मनमोकळा संवाद साधू शकणाऱ्या असतात अशा व्यक्ती कलामांशी काय बोलत असतील? आपल्या राष्ट्रपतिपदाच्या कारकिर्दीत राष्ट्रपती भवनातील बागेत असलेल्या एका राहुटीसदृश खोलीत अरुण तिवारी आणि डॉ. कलाम यांनी जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणाऱ्या गप्पा मारल्या. त्यातील काही संवादांचा संग्रह म्हणजेच ‘दीपस्तंभ’ हे पुस्तक. अनुवादातील थोडी अवघड भाषा हा दोष वगळला, तर अत्यंत प्रेरणादायी आणि विचारांना दिशा देणारे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक मुळात तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. पहिला भाग हा अंत:स्थ प्रेरणेशी जोडलेला आहे. विचार, भावना, माहिती, ज्ञान, संवेदना, अंत:स्फूर्ती, कल्पना अशा बाबींवर या भागात कलाम आणि तिवारी यांनी आपले विचार मांडले आहेत. या पुस्तकाचा दुसरा भाग हा लौकिकार्थाने आपण ज्यांना महात्मे म्हणून ओळखतो अशा व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी आदी बाबी उलगडतो. तर तिसरा भाग, ज्याला विश्वाचे सारतत्त्व असे भारतीय तत्त्वज्ञान म्हणते त्यावर टिप्पणी करतो.
आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ‘मीच का’ आणि ‘मग मी कोण’ हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. काही लोक या प्रश्नांनी बेचैन होतात आणि त्याचे उत्तर मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, तर काही हा प्रश्नच दुर्लक्षित करतात. कलाम आणि तिवारी या द्वयीने या प्रश्नाकडे लक्ष कसे द्यावे हे सुचविले आहे. आपण म्हणजे जगाकडे ‘उघडय़ा’ डोळ्यांनी पाहायला लावणारी जाणीव असे त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
अरुण तिवारी यांनी कलामांना अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे प्रश्न विचारले आहेत. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, लहानपणी आई-वडिलांचे ऐकणे हा गुण मानला जातो पण मोठेपणी – स्वतंत्र विचार करायला लागल्यावरही मुलांनी आई-वडिलांचे ऐकावे का, आणि समजा असे ऐकता आले नाही तर मुलांनी अपराध केला असे मानायचे का, असा प्रश्न तिवारींनी विचारला आहे. कलामांनी या प्रश्नाचे उत्तर फार सुंदर दिले आहे. चांगले-वाईट कळण्यासाठी अजाणत्या वयात मुलांनी आई-वडिलांचे ऐकावे आणि असे वर्तन करणाऱ्यांना आपण गुणी म्हणतो हे योग्यच आहे. पण बदलत्या काळानुसार आणि स्वत: विचार करू लागल्यानंतर निव्वळ पालक सांगताहेत म्हणून नाही तर त्यामागील तर्कशास्त्र-भावना आणि दिशा समजून आपला निर्णय घेता येणे म्हणजेच प्रगल्भता असे मत त्यांनी नोंदविले आहे.
आत्मा म्हणजे काय, विज्ञान आणि देव यांच्यात काही नाते असते का, राष्ट्रांत सुव्यवस्था नांदण्यासाठी प्रत्येक घर- कुटुंब काय करू शकते, महात्म्य म्हणजे काय, आपल्या आसपास राहणाऱ्या व्यक्तींमध्ये ते कसे शोधावे अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे किंवा अशा प्रश्नांवरील मते डॉ. कलाम यांनी नोंदविली आहेत.
या पुस्तकामध्ये मांडलेले आध्यात्मिक विचार, मुद्दे, पुस्तकात विचारण्यात आलेले प्रश्न- त्यांची उत्तरे कदाचित आपल्याला जशीच्या तशी पटतीलच असे नाही. पण आपण त्या मुद्दय़ांवर विचार करू लागतो आणि विचार करण्यास उद्युक्त होणे हाच व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलभूत घटक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुस्तक : दीपस्तंभ – जीवन प्रयोजनविषयक संवाद
लेखक : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि
अरुण तिवारी
प्रकाशक : राजहंस
पृष्ठे : १३४
मूल्य : १२० रुपये

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookshelf book review of deepstambh by dr a p j abdul kalam