भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा बालाकोट एअर स्ट्राइकसारखा पाकिस्तानी लष्कराकडून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करायचा होता. एका नव्या पुस्तकातून हा खुलासा झाला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील हल्ल्यानंतर वाजपेयींनी सुद्धा एअर स्ट्राइकचा विचार केला होता. यासंबंधींच्या बातम्या या आधी सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्यांना याबद्दल माहित होते त्यांनी कधीही या योजनेचा खुलासा केला नाही. २८ जूनला राजधानी दिल्लीत माजी नौदल प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांच्या ‘अ प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यामध्ये एअर स्ट्राइकचा उल्लेख आहे.

जैशच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केल्यानंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी लष्कराच्या ऑपरेशन्स रुममध्ये माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांची भेट घेतली होती. काय आणि कसे प्रत्युत्तर द्यायचे त्यावर सर्व चर्चेचा भर होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांसाठी चालवला जाणारा मोठा तळ उद्धवस्त करण्याची योजना आखण्यात आली होती.

शेवटच्या मिनिटाला गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एअर स्ट्राइकचा हा निर्णय रद्द करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने शाळा आणि मोठया हॉस्पिटलच्यामध्ये तळ हलवला होता. त्यामुळे स्ट्राइकमध्ये अडचणी होत्या. भारतीय सुरक्षादलांमध्ये यावर चर्चा सुद्धा झाली. स्ट्राइकमध्ये निष्पापांची जिवीतहानी मान्य नव्हती. त्यामुळे दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्याऐवजी लष्कराने ऑपरेशन पराक्रमतंर्गत सीमारेषेवर दहा महिन्यांसाठी सैन्य तैनात केले. अॅडमिरल सुशील कुमार यांच्या पुस्तकात ही सर्व माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayee planned strike post parliament attack former navy chief sushil kumar dmp