एककीडे जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे चीनच्या कुरापतींमुळे सीमेवरही तणाव वाढत आहे. सध्या चीननं लडाखमधील सीमेवर लष्कराच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. चीनच्या लष्करानं गॅल्वान व्हॅलीमध्ये आपले तंबू उभारले आहेत. तर दुसरीकडे पँगाँग सरोवरानजीकही चीनच्या सैन्यानं गस्त वाढवली आहे. अशा परिस्थितीतही या तणावाला भारतच जबाबदार असल्याचं चीनचं म्हणणं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गॅल्वान व्हॅली हा चीनचाच एक भाग आणि भारत जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. भारतानं गॅल्वान व्हॅलीमध्ये अवैधरित्या लष्करी सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. यामुळे चीनकडे भारताला प्रत्युत्तर देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सीमा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे, असं चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

१९६२ ची करून दिली आठवण

अमेरिकेसोबत चीनचे संबंध सध्या उत्तम नसले तरी चीनची आंतरराष्ट्रीय स्थिती ही १९६२ पेक्षा उत्तम आहे. त्यावेळी भारताला चीनकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा दोन्ही देशांची ताकद एकसारखीच होती. परंतु आता चीनचा जीडीपी हा भारताच्या तुलनेच पाच पट अधिक आहे. भारतीय सरकार, लष्कर, बुद्धीजीवी आणि माध्यमं चीनबाबत या गोष्टी समजून घेतील, अशी अपेक्षा असल्याचंही ग्लोबल टाईम्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

भारतीयांनी गैरसमज बाळगू नये

काही पश्चिमी राष्ट्रांनी चीनला घेरल्यामुळे तसंच करोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झआला आहे त्याचा फायदा घेऊन जर सीमेवर भारताला आपली स्थिती बळकट करण्याची संधी मिळाली आहे, असं भारतीयांना वाटत आहे. काही जण अमेरिकेचं समर्थन करत आहेत. परंतु ही त्यांची चुक आहे. यामुळे भारतालाच जास्त नुकसान होणार आहे. अमेरिकेसाठी त्यांचं हितच सर्वात महत्त्वाचं असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China threatens india border issue global times editorial jud