नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधातील लढाई ही केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही तर सर्व भारतीयांसाठी हा कायदा चिंताजनक आहे, या कायद्याविरोधात ठोस  लढा द्यावा लागेल, असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबाद येथे शनिवारी रात्री उशिरा खासदार ओवेसी यांनी सांगितले की, ‘जर मी भारतीय असेन तर ते सिद्ध करण्यासाठी रांगेत का उभे रहावे, मी या भूमीत  जन्माला आलो असेन तर अर्थात भारताचा नागरिक आहे ते वेगळे सिद्ध करण्याची गरज नाही. नवीन कायद्यामुळे भारतातील १२५ कोटी नागरिकांना रांगेत उभे रहावे लागणार आहे. हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही. सर्व भारतीयांना त्याचा फटका बसणार आहे. मोदी भक्तांनाही रांगेत उभे रहावे लागेल व कागदपत्रे सादर करावी लागतील.’

युनायटेड  मुस्लिम अ‍ॅक्शन कमिटीच्या बैठकीत त्यांनी सांगितले की, ‘भारतीय मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी जिनांच्या दोन देश सिद्धांताला नाकारून भारतात राहणे पसंत केले. भाजपने अनेक इस्लामी देशांत काय चालते त्याचे दाखले दिले असले तरी त्याच्याशी काही देणेघेणे नाही. आम्ही भारतातील परिस्थितीवर चर्चा करीत आहोत. माझे प्रेम भारतावर आहे. मी जन्माने व पर्यायाने भारतीय आहे, तुम्हाला गोळ्या चालवायच्या असतील तर चालवा, पण माझे देशावरचे प्रेम संपणार नाही.’

‘घरावर राष्ट्रध्वज लावा’

ओवेसी म्हणाले की, राज्यघटना बचाव मोहीम आम्ही राबवली असून त्यात सर्व भारतीयांनी सहभागी व्हावे. ज्यांचा नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध आहे, त्यांनी घरावर देशाचा राष्ट्रध्वज लावावा. त्यातून फॅसिस्ट शक्तींना योग्य तो संदेश जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizenship registration law is not just a question of muslims abn