भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असतानाच रशियाने पाकिस्तानशी २.६ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास २२ हजार कोटींचा करार केल्याने हा भारताला धक्का मानला जातो. या आर्थिक सहकार्यातून या दोन देशांदरम्यान लष्करी व तांत्रिक मदतीचे दरवाजे खुले होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.
रशिया-भारत यांच्यात सौहार्दाचे संबंध असताना अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची कृती आश्चर्यकारक मानली जाते. या करारानुसार कराचीत एक अत्याधुनिक पोलाद प्रकल्प उभा करण्यात येईल. या कराराने २०१५ मध्ये बंद पडलेल्या पाकिस्तान ‘स्टील मिल्स’ला उभारी मिळणार असून यातून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बळकटी लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रशियाने हा करार निव्वळ आर्थिक असल्याचे नमूद केले. मात्र औद्याोगिक तसेच तांत्रिक सहकार्यातून द्विपक्षीय संबंध दृढ होतात हे यापूर्वीही सिद्ध झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. त्यामुळे या कराराचे वेगळे अर्थ लावले जात आहेत. भारतासाठी रशिया हा संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील विश्वासू भागीदार आहे.
करार काय?
●कराचीत बंद पडलेला पोलाद प्रकल्प सुरू करण्यासाठी हा करार आहे. हा प्रकल्प १९७० च्या दशकात सोव्हिएत संघाच्या मदतीने उभा करण्यात आला होता.
●आर्थिक व तांत्रिक कारणांनी २०१५ मध्ये हा प्रकल्प बंद करण्यात आला. नव्या करारानुसार रशिया या पोलाद प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त यंत्रणा देईल.
● यामुळे पोलाद आयातीवरील पाकिस्तानचे अवलंबित्व तीस टक्के कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.