मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी (१४ जुलै) ‘सुरज’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसात झालेला हा दुसरा मृत्यू होता. आफ्रिकेतून भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांपैकी आठ चित्ते गेल्या चार महिन्यात मृत्यूमुखी पडले आहेत. मार्च २०२३ पासून सुरू झालेलं चित्त्यांचं मृत्यूसत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी ‘तेजस’ या चित्त्याचा मृत्यू झाला होता. सातत्याने होत असलेल्या या मृत्यूंचं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशातच आफ्रिकेतील तज्ज्ञांनी अजब दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफ्रिकेतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या चित्त्यांच्या गळ्यात बांधलेले रेडिओ कॉलर हे या चित्त्यांच्या मृत्यूंचं प्रमुख कारण आहे. दरम्यान, तज्ज्ञांचा हा दावा केंद्र सरकारने फेटाळला आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या २० पैकी पाच प्रौढ चित्ते हे नैसर्गिक कारणांमुळे मरण पावले आहेत, असं पर्यावरण मंत्रालयाने रविवारी सांगितलं. तसेच रेडिओ कॉलरसारख्या घटकांमुळे मृत्यू होत आहेत असं म्हणण्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. हे काहींचे वैयक्तिक अंदाज आणि अफवा असल्याचं पर्यावरण विभागाने म्हटलं आहे.

पर्यावरण मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकारची समिती या प्रकल्पाच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि या समितीने प्रकल्पाच्या अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. भारताच्या चित्ता प्रकल्पाशी संबंधित काही तज्ज्ञांनी सांगितलं की, रेडिओ कॉलरमुळे संसर्ग होऊन चित्त्यांचा मृत्यू झाला असेल. परंतु हा दावा न पटण्यासारखा आहे. कारण गेल्या दोन दशकांहून अधिक काळ वन्यजीव संरक्षणासाठी भारतात या रेडिओ कॉलर्सचा वापर केला जात आहे. चित्त्यांच्या पोस्टमॉर्टम अहवालावरून मृत्यूंचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जे. एस. चौहान यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, “आमची उद्या या विषयावर बैठक होणार आहे. पावसामुळे रेडिओ कॉलर खराब होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. तर बऱ्याचदा जास्त आर्द्रतेमुळे चित्ते त्यांची त्वचा खाजवू शकतात. त्यामुळे त्यांना जखम होऊ शकते आणि या जखमेवर माशा बसल्याने संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे रेडिओ कॉलर हे चित्त्यांच्या मृत्यूचं कारण असू शकतं. तसेच याची इतरं कारण जाणून घेण्यासाठी आम्हाला सखोल तपासणी करण्याची गरज आहे. अलिकडे ज्या दोन चित्त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अवयवांना सारखंच नुकसान झालं आहे.

कुनो अभयारण्याची क्षमता १० ते १२ चित्ते राहू शकतील इतकीच आहे. जास्तीत जास्त पंधरा चित्ते तिथे राहू शकतात. त्यामुळे काही चित्त्यांना इतर अभयारण्यांमध्ये हलवावं. अभयारण्यात प्रती चौरस किलोमीटर २० चितळ आहेत आणि चित्त्यांच्या शिकारीसाठी हे पुरेसं भक्ष्य नाही. चित्त्यांना चिंकारा आणि इतर प्राणी खायची सवय आहे. चितळ त्यांची भूक शमवू शकत नाहीत.

हे ही वाचा >> Video: वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग, दिल्लीच्या दिशेनं निघाली होती ट्रेन!

कुनोमध्ये आतापर्यंत २० चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आणखी चित्ते सोडल्यास मानव-चित्ता संघर्ष सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलिकडचे एक नर आणि एक मादी चित्ता राष्ट्रीय उद्यानाची सीमा ओलांडून गावाजवळ पोहोचले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radio collars can be the cause death of cheetahs in kuno national park asc