भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तयारी सुरू झाली आहे. परेड तसंच विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला उद्याचा दिवस देशासाठी फार महत्त्वाचा आहे. यावर्षीचा हा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर तिरंगा फडकावला जातो. तर १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला जातो. या दोन्ही दिवसांमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहित आहे का? झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी दोन्ही दिवशी झेंडा फडकवण्याची पद्धत, जागा यामध्ये अनेक फरक आहेत.
- १५ ऑगस्ट ला पंतप्रधान झेंडा फडकवतात तर २६ जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.
- १५ ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला ध्वज फडकावणे म्हणतात.
- १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचा झेंडा खाली उतरला आणि भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.
- १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.