नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून सातत्याने जायबंदी होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खडेबोल सुनावले आहेत. काही भारतीय खेळाडू बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) कायमचे रहिवासी झाले आहेत. त्यांना सलग चार सामनेही खेळता न येणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे परखड मत शास्त्री यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शास्त्री यांनी कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा इशारा चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरकडे होता. ‘एनसीए’मध्ये सातत्याने उपचार घेऊनही चहरला गेल्या आठ महिन्यांत तीन वेळा सामन्यांदरम्यान दुखापत झाली आहे. चहर दुखापतीमुळे गेल्या काही काळापासून मैदानाबाहेर होता. परंतु यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) सुरुवात होण्यापूर्वी ‘एनसीए’च्या वैद्यकीय पथकाने चहरला तंदुरुस्त घोषित केले होते. मात्र, या स्पर्धेतील तिसऱ्याच सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकण्याची दाट शक्यता आहे.

‘‘गेल्या तीन-चार वर्षांपासून बरेच खेळाडू ‘एनसीए’चे कायमचे रहिवासी झाले आहेत. त्यांना लवकरच कधीही ‘एनसीए’मध्ये दाखल होण्याची परवानगी मिळेल. सध्याची परिस्थिती अतिशय लाजिरवाणी आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.  

भारताचे जायबंदी खेळाडू उपचारासाठी आणि सरावासाठी ‘एनसीए’मध्ये दाखल होतात. गेल्या काही काळापासून चहरसह जसप्रीत बुमरा आणि प्रसिध कृष्णा हे भारताचे वेगवान गोलंदाज दुखापतींनी त्रस्त आहेत. चहरच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. बुमरा आणि प्रसिध यांनी बराच काळ ‘एनसीए’मध्ये पाठदुखीवर उपचार घेतले. परंतु त्यांची दुखापत गंभीर असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही भारतीय वेगवान गोलंदाज क्रिकेटच्या एक किंवा दोन प्रारूपांतच खेळतात. असे असतानाही त्यांना सातत्याने दुखापत होणे आणि सलग चार ट्वेन्टी-२० सामनेही खेळता न येणे, हे आश्चर्यकारक असल्याचे शास्त्री यांना वाटते.

‘‘काही खेळाडू सातत्याने सामनेही खेळत नाहीत, तरी त्यांना दुखापती होतात. तुम्हाला सलग चार सामनेही खेळता येऊ नयेत? तुम्ही ‘एनसीए’मध्ये कशासाठी जाता? उपचार घेऊन मैदानावर परतल्यानंतर तीन सामन्यांनी तुम्हाला पुन्हा दुखापत होते. मग तुम्ही पुन्हा ‘एनसीए’मध्ये दाखल होता. माझ्या मते, खेळाडूंनी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय मैदानावर परतू नये,’’ असे शास्त्री यांनी नमूद केले. खेळाडूंना दुखापती होऊ शकतात. परंतु, दर चार सामन्यांनी एखादा खेळाडू जायबंदी होतो हे समजण्यापलीकडचे आहे. खेळाडूंना सतत होणाऱ्या दुखापती त्यांच्यासाठी, त्यांच्या संघांसाठी, ‘बीसीसीआय’साठी आणि ‘आयपीएल’मधील त्यांच्या संघांच्या कर्णधारांसाठी निराशाजनक ठरतात. – रवी शास्त्री

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri slams indian players with constant injuries zws