पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी ज्या दिवशी भारताचे पंतप्रधान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बंद करू शकतात असे म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या ५० टक्के निधीतून चालतो आणि आयसीसीला ९० टक्के निधी हा बीसीसीआयकडून येतो असे रमीझ राजा यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटेल त्या दिवशी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बंद करू शकतील, असेही राजा यांनी म्हटले आहे.
रमीझ राजा यांनी सिनेटच्या स्थायी समितीच्या बैठकीत हे वक्तव्य केले आहे. “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या ५० टक्के निधीवर चालतो आणि आयसीसीचा निधी म्हणजे ते स्पर्धा आयोजित करतात आणि त्यांच्याकडून येणारा पैसा त्यांच्या सदस्यांच्या मंडळांमध्ये वितरित केला जातो. आयसीसीचा हा ९० टक्के निधी बीसीसीआयकडून येतो. एक प्रकारे भारताचे पैसे पाकिस्तान क्रिकेट चालवत आहेत. जर उद्या भारतीय पंतप्रधानांना वाटले की आम्ही पाकिस्तानला निधी देणार नाही, तर पीसीबी कोलमडू शकते,” असे रमीझ राजा यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरद्वारे हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ समोरासमोर येण्याआधीच नवी चर्चा सुरु झाली आहे.
याआधी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानी खेळाडूंना बंपर ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती. ”एका मोठ्या गुंतवणूकदाराने मला सांगितले आहे, की पीसीबीसाठी कोरा चेक तयार आहे. आगामी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताचा पराभव करण्यात यश आले तर ते हा चेक देतील. विश्वचषकात दोन्ही संघ १२ वेळा आमनेसामने आले आहेत. या दरम्यान, दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकात ७ वेळा आणि टी-२० विश्वचषकात ५ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. आजपर्यंत पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये भारताला हरवू शकलेला नाही,” असे राजा यांनी म्हटले आहे. दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ २४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत.