भारतीय संस्कृतीत आज असलेल्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याची सुरुवात या दिवसाने होते. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरुकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरुची पूजा करणे, त्यांच्यासमोर नतमस्तक होणे असे या दिवशी अभिप्रेत असते. या काळात जास्त थंडी आणि उकाडा दोन्ही नसल्याने पूर्वीच्या काळी हा कालावधी गुरुकडून ज्ञान घेण्यासाठी चांगला मानला जात असे. या काळात गुरुही एकाच ठिकाणी असल्याने शिष्याला गुरुकडे जाऊन ज्ञान घेणे सोपे जात असे. आता काळानुसार यामध्ये बदल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यास ऋषींचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. व्यास ऋषी हे संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी चारही वेदांची रचना केली आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. गुरुने आपल्याला ज्ञान दिले नाही तर आपण काहीही करु शकत नाही अशी धारण पूर्वीच्या काळी होती. त्यामुळे समाजात गुरुंना विशेष स्थान होते. आताही देशभरात ही पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

शाळा-महाविद्यालयांमध्ये या दिवशी खास कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. त्याशिवायही शहरातील अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपला गुरु असतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. कलेच्या विश्वातही गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आपल्या गुरुंना भेटवस्तू तसेच गुलाबाचे फूल देऊन हा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. गुरुंनी दिलेल्या विद्येचा योग्य पद्धतीने वापर करणे हीच गुरुंची खरी दक्षिणा असते असा विचारही यानिमित्ताने मांडण्यात येतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru purnima 2018 special importance of this day vyasa purnima