नवी दिल्ली : करोनाच्या साथीत क्षयरोग (टीबी) नियंत्रण मोहिमेवर परिणाम झाला. दरवर्षी २४ मार्चला जागतिक क्षयरोग दिन असतो. आरोग्यासह सामाजिक आणि आर्थिक नुकसान करणाऱ्या या संसर्गजन्य रोगाबद्दल जनजागृती व्हावी, हा यामागचा हेतू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदा क्षयरोग दिनाचे ‘क्षयरोगासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा’ तसेच ‘जागतिक स्तरावरील नेत्यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या संकल्पपूर्तीसाठी विविध मार्गानी प्रयत्न निकडीचे’ असे सूत्र ठरवले आहे.
क्षयरोग हा जगातील जुन्या संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. प्रत्येक देशात तो अस्तित्वात आहे. दरवर्षी एक कोटी नागरिकांना क्षयरोगाची बाधा होते. क्षयरोगास प्रतिबंध करता येत असला अथवा तो बरा होऊ शकत असला, तरी दहा लाखांवर रुग्णांचा यामुळे मृत्यू होतो. करोनामुळे या रोगाच्या निर्मूलन मोहिमेकडे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा क्षयरोग निर्मूलन मोहीम तीव्र करण्यावर जागतिक आरोग्य संघटनेचा भर आहे. फुप्फुसाचा क्षयरोग आणि फुप्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांत होणारा क्षयरोग, असे या रोगाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार फुप्फुस क्षयरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे : तीन आठवडय़ांहून अधिक काळ चाललेला खोकला अथवा कोरडा खोकला, थुंकीतून कफ आणि रक्त जाणे, हलका ताप, अशक्तपणा वाटणे, छाती सतत दुखणे, अपचन, सहा महिन्यांत शरीराचे कोणत्याही कारणाविना पाच टक्के वजन घटणे.
इतर अवयवांत होणारी क्षयरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे : (पोटाचा क्षयरोग) ओटीपोटात अस्वस्थता वाटणे-दुखणे, (मेंदूचा क्षयरोग) तीव्र डोकेदुखी आणि मान जड होणे-हलवता न येणे, (पेशींचा क्षयरोग) जखम भरून न येणे, (अस्थी क्षयरोग) असह्य पाटदुखी, हालचाल करताना वेदना-चालता न येणे, (मानेचा क्षयरोग) मानेच्या सांध्यांवर सूज येते, (जननेंद्रियाचा क्षयरोग) मूत्रमार्गात संसर्ग, स्त्रियांत अनियमित मासिक पाळी, पुरुष-स्त्रियांतील वंध्यत्व. क्षयरोगाला दूर ठेवण्यासाठी आपल्या प्राथमिक लसीकरण मोहिमेनुसार एक वर्षांच्या आत मुलांना बीसीजी लसीकरण करून घेणे, कुपोषण आणि तणावामुळे या रोगाचा धोका वाढतो. पौष्टिक अन्नसेवन आणि योग्य प्रमाणात निद्रा गरजेची आहे. शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकून घेणे, कुठेही न थुंकता त्यासाठी योग्य जागेचा वापर करावा. क्षयरुग्णासोबत राहणाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. रुग्णानेही मास्क वापरावा. तसेच तंबाखू, मद्यसेवन, धूम्रपान या व्यसनांपासून दूर राहावे, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आहे.