प्रमोदकुमार अणेराव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिकीकरण हा या युगाचा सर्वात मोठा वळणिबदू आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. जागतिकीकरणामुळे आपण मर्यादित अर्थाने काही चांगल्या गोष्टी मिळविल्या असल्या, तरी त्याचे दृश्य दुष्परिणाम मोठय़ा प्रमाणात आपण आजही भोगत आहोत. जागतिकीकरणाच्या या झंझावती आवेगाने आपले व्यवसाय, आपली भाषा, आपली संस्कृती, आपले विचारव्यूह, आपली एकूणच मूल्यव्यवस्था याची मोठय़ा प्रमाणात मोडतोड झालेली आहे. जागतिकीकरणाने एकूणच आपल्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याचा परिणाम महानगैरे, लहान शहरे यांच्यावर जसा विशेष करून झालेला आहे, तसाच तो ग्रामीण जीवनावरही जोरकसपणे झालेला आहे. आज सांप्रत कृषिसंस्कृती- जी पोखरलेली आपल्याला दिसते त्याच्याही मुळाशी जागतिकीकरण हेच आहे. म्हणूनच हा परिणाम अधिक स्पष्टपणे अधोरेखित करता येतो.

जागतिकीकरणाच्या विदारक वास्तवाने नव्वदोत्तर पिढीच्या कवी, लेखक, कलावंतांना खूप अस्वस्थ केले आहे. जागतिकीकरणाच्या या सगळ्या पेचांना पुढे कसे जावे, हा खरा प्रश्न नव्वदोत्तर पिढीपुढे होता. किशोर कवठे हा या पिढीचा अत्यंत संवेदनशील प्रतिनिधी आहे. समकालाचे संवेदन तो अपार समानाभूतीने (Empathy) मांडतो. त्यांच्या ‘पसरत गेलेली शाई’ व ‘गावसूक्त’ या दोन्ही कवितासंग्रहांत जागतिकीकरणाच्या पडझडीचे वास्तवदर्शी स्वर आपल्याला स्पष्टपणे उमटलेले दिसतात. ‘दगान’ या किशोर कवठे यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातून तेच स्वर अधिक गडद व तीव्र झालेले आपल्याला दिसून येतात.

किशोर कवठे हे व्यक्ती म्हणून ज्या परिसरात जन्मले, वाढले तो परिसर आता कोलमाइन्सने व्यापला आहे. खाणीचा वाढता प्रभाव, अधिक कोळसा काढता यावा यासाठी खाण कंपनीचा हव्यास आणि त्यासाठी सभोवतालच्या जीवितांची चालवलेली हेळसांड आणि त्याहून राज्यकर्त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष.. या सर्वामुळे त्या परिसरातील स्थानिकांच्या जगण्यावर जो परिणाम झालेला आहे, त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किशोर कवठे हा संवेदनशील कवी आहे. खरे तर दगान म्हणजे खाणीत लावलेले सुरुंग- त्याचा स्फोट. दगान म्हणजे दगागणे, हादरे बसणे असा विविध अर्थ दगान शब्दाला आहे. खरे तर दगान हीच मोठी प्रतिमा या संपूर्ण कवितासंग्रहातून अर्थाचे अनेक पदर घेऊन अवतरताना आपल्याला दिसते. ही दगान केवळ कोलमाइन्सपुरती किंवा खाण परिसरातीलच ठरत नाही तर ती खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या त्रयींमुळे एकूण भारतीय परिप्रेक्ष्यात झालेल्या पडझडींचे, हादऱ्यांचे संसूचन करणारी आहे.

‘पहिले बकरी मग रहीमकाका

बोगदा ‘आ’ वासून पहुडलेला

माणसांची वाट बघत

अर्थहीन डोहासारखा’ (रहीमकाका आणि बकरी)

‘दगान’ या कवितासंग्रहात सकृत्दर्शनी कोलमाइन्स, भुई, गाव असे विषयवस्तूच्या वर्गीकरणाच्या दृष्टीने तीन भाग केलेले असले तरी जागतिकीकरणामुळे व्यक्तींच्या पिचलेल्या धारणा-अवधारणा, हव्यास आणि महत्त्वाकांक्षा यांच्या उभ्या केलेल्या तटबंद्या, श्रद्धा, नीतिमूल्ये यांना बसणारे हादरे, जागतिकीकरणामुळे सर्व स्तरात आलेले वैफल्य, हताशा, अर्थशून्यता, पराकोटीची परात्मता या सर्वाना दिलेली ही प्रतिक्रिया आहे. पण ती अभिनिवेशी किंवा आवाजी नाही तर तिचा सूर अधिक समंजस, अधिक संयत अधिक सूचकपणे ‘दगान’ या संपूर्ण कवितासंग्रहातून ऐकू येत राहतो. शेती आणि पर्यावरण यांचा सहसंबंध स्पष्ट करताना औद्योगिकीकरणाच्या प्रभावाने शेतीच नाही तर संपूर्ण अधिवासशास्त्रीय जीवन नष्ट होऊ शकते, ही संवेदना कवी व्यक्त करतात.

‘जेव्हा शेती जाते कंपनीत

तेव्हा केवळ माती जात नाही

परंपरेची भूक करपली जाते

प्राणी जातो पक्षी जातो

आणि शेवटी माणूसही जातो. ’(जेव्हा शेती जाते..)

खरे तर माती, नाती, आणि भवताल हे ‘दगान’मधील विषयवस्तू आहेत. या विषयवस्तूच्या खोलात जाऊन सगळ्या अंतर्वरिोधाने प्रभावित झालेलं व्यक्तिगत आणि सामाजिक जगणं आणि त्यामागची भौतिक, मानसिक, भावनिक भूमी कवी या कवितासंग्रहातून अचूकपणे मांडतो.

‘सूर्याचे प्रतिबिंब पडलंय

जमिनीच्या पृष्ठभागावर

मातीला पडल्यात खोल-खोल भेगा

कालच्या हिरव्या झाडांचा कोळसाच झाला आहे जणू..’

(ब्रेकिंग न्यूज होत नसलेली बातमी..)

या कवितांचा स्वर हा आत्मलक्ष्यी नसून तो समूहलक्ष्यी आहे. वैयक्तिक सुखदु:खात हा कवी फारसा रमत नाही उलट तो आपल्या ‘स्व’चे समष्टीमध्ये विलोपण करू पाहतो. खरे तर व्यापक समूह जाणीव निर्वविादपणे उभी करू पाहणारी ही कविता आहे. त्यामुळे ती वाचकांच्या बोधनेत थेटपणे उतरते. समकाळाने उभे केलेले पेच, अवरोध, प्रश्न, आव्हाने, सारे अंतर्वरिोध याला पुढे जाताना आणि त्याच्या सगळ्या जीवघेण्या अनुभवांना पचविताना जी सगळी आंतरिक घालमेल होते, त्यासाठी जी एक कृतीयुक्त सजगता हवी असते त्या सर्वाची लय आपल्या कवितेतून लीलया सांभाळत नेणारा हा कवी आहे. म्हणूनही किशोर कवठे या दशकातील महत्त्वाचा कवी ठरतो.

‘अवकाळी पावसाने कालवले शेण

अन्नामध्ये सालोसाल पेरले मरण

घाव काळजाला पडे, नक्षत्राला नाही

अशी कशी रिती झाली ढगातली शाई।’ (ढगातली शाई )

ढगातील शाई, बदफैली पाणी, विचारांचे अ‍ॅबॉर्शन्स, समतेचे सांडपाणी, मेंदूतील डेन्ड्रप, वीज मुक्त अर्थव्यवस्थेसारखी अशा विविध प्रतिमा, बोलीच्या वापरातील रूढ व नवे शब्द या कवितासंग्रहाची बलस्थाने म्हणता येईल. परंतु प्रतिमेच्या भाषेत बोलणे ही या कवीची स्वाभाविकता नाही. तिचा रोख सरळ संवादाकडे आहे. यातील ज्या काही प्रतिमा येतात त्या सर्व सभोवतालच्या जगण्यातून अपरिहार्यपणे येतात. म्हणून त्या आशयाशी एकजिनसी होऊन अवतरतात. केवळ संसूचनेसाठी तिची योजकता असते. या प्रतिमा पारंपरिक असल्या तरी त्या कवितेचे अंगभूत सौंदर्य वाढविणाऱ्या आहेत. खरे तर या कवितेकडे वास्तवाचे प्रतिरूपण म्हणून आपल्याला बघता येईल.

शैली, लय, आकृतिबंध या अंगाने ही कविता मराठीत खूप अशी वेगळी आणि पृथगात्म नाही; परंतु मराठी कवितेचे सगळे संचित तिने पचविलेले आहे. आकृतिबंधाच्या दृष्टीनेही ही कविता तंत्रशरण नाही. उलट पारंपरिकतेतून नवा आशय देता येईल का, असे ती सारखे बघत असते. ‘दगान’मधील कविता सकृद्दर्शनी सुलभ, सोपी, साधी वाटत असली तरी वाचकांना अंतर्मुख करणारी आहे. अस्वस्थ करणे हा तिचा प्रकृतिधर्म आहे. आपली काव्यजाणीव अधिक समृद्ध करणारी कविता म्हणून दगानमधील कवितांकडे पाहता येईल. समकालीन पडझडीचा वास्तवदर्शी कोलाज ‘दगान’च्या निमित्ताने आपल्याला जरूर अनुभवता येतो. किशोर कवठे यांच्या कवितेचे प्रगल्भ आणि परिणत रूप दगानमध्ये पाहायला मिळते. मानवी विकारातून मार्ग काढत, हिरवळीच्या पायवाटेने प्रवास करणाऱ्या या कवीच्या कविता वाचकांनी नक्की अनुभवाव्यात असेच तिचे आशयतत्त्व आहे.

‘दगान’- किशोर कवठे,  सप्तरंग प्रकाशन, राजुरा

पृष्ठे- ९७, मूल्य- १२५ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dagan book review by author kishor kawathe saptrang prakashan author zws