राजकारणात मतभेद असूनही सर्व पक्षातील चांगल्या राजकारण्यांविषयी बाळासाहेबांच्या बोलण्यातून कधीही वैरभाव जाणवला नाही. मुळात त्यांच्या मनातच तो नसावा म्हणूनच उच्चारातूनही तो कधीही बाहेर आला नाही. तसाही विरोधासाठी विरोध त्यांच्या बोलण्यातून कधीच जाणवला नाही. चांगले ते चांगलेच आणि वाईट ते वाईटच, असा कणखर बाणा त्यांचा होता. हिंदुत्वाशी तडजोड करणे त्यांना अजिबात मान्य नसे, अशी भावना रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व महाराष्ट्रातील ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ.विलास डांगरे यांनी व्यक्त केल्या. युती शासनाच्या काळातील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी डॉक्टर म्हणून माझे नाव सुचवल्यामुळे १९९७ ते १९९९ या दोन वर्षांत बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करण्याची संधी मिळाली. या काळात बाळासाहेबांचा बुलावा आला की, दर दीड दोन महिन्यांनी मातोश्रीवर त्यांची प्रकृती बघ्याला रात्री ११ वाजताच्या विमानाने जाऊन सकाळी परतत असे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या अध्र्या तासात ट्रिटमेंट आणि आरोग्यावर बोलणे झाल्यावर पुढे तास दोन तास अवांतर विषयांवर बाळासाहेबांशी दिलखुलास गप्पा होत. तसे ते गप्पीष्ट. यात आध्यात्म, संगीत, वैद्यकशास्त्र, राजकारण आणि समाजकारणातील विविध पैलूंवर गप्पांच्या फैरी झडत. या सर्व आणि इतरही क्षेत्रांविषयी त्यांना कमालीचे औत्सुक्य असे. त्यातील अधिकाधिक माहिती करून घेण्याची तळमळीही यातून जाणवायची.

ती भेटच अखेरची ठरली..

समाजातील चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा आणि वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी काय काय केले पाहिजे, हे त्या त्या क्षेत्रातील जाणकारांकडून जाणून घेण्यासाठीही ते कमालीचे तत्पर असत. अध्यामिक क्षेत्रातील अमंगल गोष्टींविषयी ते नाराजी व्यक्त करीत. तसे चांगल्या गोष्टींसाठी वाटेल ते किंमत मोजायची त्यांची तयारी असायची. रात्री मातोश्रीवर पोहोचल्यावर दोन तास गप्पात कसे निघून जात, हे कळतही नसे.

डॉक्टर म्हणून मी जे काही पथ्यअ पथ्य सांगत त्याचे ते तंतोतंत पालन करीत. पेशन्ट म्हणून बाळासाहेब मोस्ट कोऑपरेटिव्ह असायचे, असे सांगून डॉ. विलास डांगरे म्हणाले, युती शासनाच्या काळात आपल्या मंत्र्यांकडून आणि आमदारांकडून चुकीच्या गोष्टी घडू नयेत, यावर त्यांचा फार कटाक्ष असे. अशाच गप्पांमधून मुस्लिमांविषयीची त्यांची भूमिका कधीमधी प्रकट होत असे.

बाळासाहेब जेव्हा आर. के. लक्ष्मणना भेटतात..

या देशाला आपली मायभूमी मानणाऱ्या मुस्लिमांविषयी ते कायम आदर बाळगून असत, पण मातृभूमीशी गद्दारी करणाऱ्या कुणाहीविषयी त्यांच्याकडे मुलाहिजा नसे. सारे काही स्पष्ट असे. तोंडदेखलेपणा त्यांना खपत नसे. या दोनेक वर्षांच्या कार्यकाळात बाळासाहेबांमधील माणूसपण आणि  वडिलधारेपणही जवळून न्याहाळता आले.

त्या आजारातून ते बरे -झाल्यावर उभयतातील संपर्क दूरध्वनीवरून वरचे वर होत असे. या संबंधातूनच अगदी निक्षून सांगून नागपुरात आल्यावर ते घरीही येऊन गेले. सोबत उध्दव, आदित्य, मनोहरपंत जोशी आणि सुभाष देसाईही होते. आता या आधारवडाच्या त्याच आठवणी उरात जपून रहावे लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray alwayes say right to right and wrong to wrong