सीमावाद, महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्य, दिशा सालियन-सुशांत सिंह प्रकरण आणि शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने केलेले बलात्काराचे आरोप यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील अधिवेशनाचा पारा चढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाला गैरहजेरी राहत दिल्लीला गेले. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. या भेटीबाबत पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारलं. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी या भेटीचं कारण सांगितलं. ते सोमवारी (२६ डिसेंबर) ओम बिर्ला यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याचं कारण विचारलं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “ही भेट सदिच्छा भेट होती. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं.”

“ती काळजी कर्नाटकनेही घेतली पाहिजे”

उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. पहिल्यांदाच केंद्रिय गृहमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं. तसेच खटला न्यायालयात आहे तोपर्यंत कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा विषय ६० वर्षांचा आहे. असं असताना या खटल्यावर कोणताही परिणाम होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. ती काळजी कर्नाटकनेही घेतली पाहिजे.”

“आम्हाला इतरांनी शिकवण्याची गरज नाही”

“आज जे केंद्रशासित प्रदेश करा म्हणत आहेत त्यांनी तर त्यांच्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री धर्मादाय निधी बंद केला. महात्मा जोतिबा फुले योजना बंद केली. आम्ही तर ते सुरू केलं. आम्ही २००० कोटी रुपयांची म्हैसाळ योजना मंजूर केली. हा एकनाथ शिंदे सीमा आंदोलनात तुरुंगवास भोगलेला व्यक्ती आहे. त्यामुळे त्यावर आम्हाला इतरांनी शिकवण्याची गरज नाही,” असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलं.

“मला केंद्र सरकारने या कार्यक्रमाला बोलावलं होतं”

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली. त्यावर शिंदे म्हणाले, “माझ्यावर कोण टीका करतंय? आज दिल्लीत वीर बाल दिवस होता. गुरुगोविंद सिंगांच्या सहा आणि नऊ वर्षांच्या दोन मुलांचं बलिदान झालं. त्यांचा सन्मान म्हणून केंद्र सरकारने २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला. गुरुगोविंद सिंग, महाराष्ट्र आणि पंजाब यांचं नातं असल्याने मला केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला बोलावलं होतं.”

हेही वाचा : Photos : नक्षलवाद्यांची धमकी ते शरद पवार मुख्यमंत्री असतानाची घटना, अजित पवारांची अधिवेशनातील महत्त्वाची वक्तव्ये

“माझ्या दिल्ली दौऱ्यावर बोलणारांनी आधी माहिती घ्यावी”

“खरं म्हणजे माझ्या दिल्ली दौऱ्यावर बोलणारांनी आधी माहिती घेतली पाहिजे होती की, मी दिल्लीला कुठल्या कार्यक्रमाला चाललो आहे. त्या मुलांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. परंतु आपला स्वाभिमान जाऊ दिला नाही. अशा शौर्याच्या गाथा निर्माण करणाऱ्या मुलांनी आदर्श घालून दिला,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde comment on why he meet loksabha speaker om birla in delhi pbs