|| मंगेश राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनसीआरबीच्या अभ्यासातील निष्कर्ष

देशभरातील महिलांच्या सुरक्षेबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) चार महानगरांचा अभ्यास केला असून त्यानुसार महिलांसाठी रात्रीची मुंबई सर्वाधिक सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढला आहे. रात्री ९ वाजल्यानंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई या चार महानगरांत  दिल्ली सर्वाधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.

गेल्या काही वर्षांपासून कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा हे मुद्दे नेहमी चर्चेत राहिले आहेत. कामाच्या निमित्ताने रात्री घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी कोणते शहर अधिक सुरक्षित आहे, याचा विविध संघटनांनी अभ्यास केला आहे. एनसीआरबीच्या जर्नलमध्ये डीएफसी इन्स्टिटय़ूटने केलेल्या पाहणीचा तपशील प्रसिद्ध केला आहे. या संस्थेने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू शहरात ‘सेफ्टी ट्रेन्डस अ‍ॅण्ड रिपोर्टिग ऑफ क्राईम’ या विषयांतर्गत पाहणी केली. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीमध्ये चार शहरांतील २० हजार ५९७ लोकांची मते घेतली. त्यापैकी मुंबईतील १३ पोलीस विभागात ७ हजार ९१०, दिल्लीत १३ पोलीस विभागात ६ हजार १८७, चेन्नईत ४ विभागात २ हजार ४३३ आणि बंगळुरूत ७ विभागात ४ हजार ६७ लोकांचे तेथील त्यांच्या सुरक्षेविषयी मत जाणून घेण्यात आले.

या नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार दिल्लीत केवळ १ टक्के लोकच महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असतात. बंगळुरूत २१ टक्के, मुंबईत १६ आणि चेन्नईत ५ टक्के लोक महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असल्याचे अभ्यासात दिसून आले. रात्री ९ नंतर घराबाहेर असणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अभ्यास केला असता दिल्लीतील ८७ टक्के महिलांचे कुटुंबीय चिंतेत असतात. बंगळुरूत रात्री घराबाहेर असणाऱ्या महिलांविषयी ५४ टक्के लोकांना भीती वाटते, चेन्नईत ४८ टक्के आणि मुंबईत ३० टक्के लोकांच्या मनात भीती असल्याचे दिसून आले. यावरून रात्री एकटे घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी मुंबई हे इतर महानगरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते. रात्री ११ नंतर दिल्लीतील ९५ टक्के लोकांना घराबाहेर गेलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. बंगळुरूतील ८४ टक्के, चेन्नईत ८३ टक्के लोकांना घराबाहेर असलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. तर मुंबईतील ६० टक्के लोकांना ही भीती वाटत असते.

रात्री एका विशिष्ट वेळेनंतर घराबाहेर पडू नये, अशी आजही आपल्याकडे मानसिकता आहे. याचा थेट संबंध नागरी सुविधा व सुरक्षेशी असतो. रात्री एका विशिष्ट वेळेनंतर घराबाहेर पडू नये, असे म्हणणाऱ्यांचे सर्वाधिक ६० टक्के प्रमाण चेन्नईत आहे. दिल्ली व बंगळुरूत ५५ टक्के तर  मुंबईतील केवळ ३३ टक्के लोक असा विचार करतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National crime records bureau on women security