|| नीलेश अडसूळ
लोकगीतांतील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘कोळीगीते’. त्यात मुंबई आणि कोळीगीते हे समीकरण अविभाज्य. या गीतांची पोहोच जातीपातींच्या सीमा ओलांडून कधीच पुढे गेली आहे. म्हणून सणसमारंभ, लग्नसोहळे कुठेही असो कोळीगीते वाजली नाहीत असे होणे कठीणच. मग ते ‘हे पावलाय देव माझा मल्हारी’, ‘एकवीरा आई गो एकवीरा आई’, ‘हिंगालय देवी’, ‘वेसावची पारू’ किंवा गेल्या दशकापूर्वीचे ‘रसिकाच्या लग्नात’ असो. या गाण्यांचा प्रभावच वेगळा. इतका की आज यूट्यूबच्या माध्यमातून हजारो कोळीगीते निर्माण होत असली तरी या जुन्या गीतांचा प्रभाव कमी झालेला नाही. विशेष म्हणजे नवीन गीते येऊनही ती ‘लोकप्रिय’ होत नाहीत ही आजची खंत आहे. आजच्या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळीगीतांच्या बदलत गेलेल्या प्रवाहांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारळी पौर्णिमा म्हणजे आगरी-कोळी बांधवांची दिवाळी. दर्या सागराच्या लेकरांचा हा उत्सव. वेसावकर मंडळींनी दिलेली कोळीगीते आजही आपल्या ओठांवर आहेत. शाहीर विठ्ठल उमप यांचे योगदानही आपल्याला विसरून चालणार नाही. शिवाय कृणाल, सुमित यांसारख्या संगीत कंपन्यांनीही कोळीगीते जनमानसात रुजवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांनी तयार केलेली गीते आजही आपण ऐकतो. हा समृद्ध वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आज अनेक तरुण खांदे पुढे येत आहेत. गाणी तयार करून यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपुढे आणणे त्यांना सहज शक्य झाले आहे. पण ही गीते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यास मात्र ते असमर्थ ठरत आहेत.

काही निर्मात्यांच्या मते यूट्यूब या माध्यमाने भरमसाट पर्याय लोकांपुढे दिल्याने लोकप्रियतेवर मर्यादा येत आहेत. तर जुन्या गीतांच्या तुलनेने नवी गाणी फारशी शब्दप्रधान नसल्याचेही काही निर्मात्यांचे म्हणणे आहे. तसेच यूट्यूबमुळे या गीतांचे अर्थकारण आणि प्रभाव यावर बराच परिणाम झाल्याचे ते सांगतात.

आगरी-कोळी समाजातील अनेक तरुण मुले कोळीगीतांचा हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सण-उत्सव, लगीन गीते, प्रेम गीते या माध्यमातून ते आपली कला आणि संस्कृती मांडत आहेत. या गाण्यांना लाखो प्रेक्षक मिळतातही, त्याची चर्चा होते, ती गाणी वाजली जातात पण एका ठरावीक काळमर्यादेपर्यंतच. म्हणून मग याही कलाकारांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जुन्या गीतांचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यासाठी नवीन बाजात, आधुनिक वाद्यांच्या साथीने ती रिमेक केली जात आहेत.

‘सीडी आणि कॅसेटचे युग लोटल्यानंतर आलेल्या यूट्यूब या माध्यमाने एखादी कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अधिक  सोपे केले. त्यामुळे भरमसाट कोळीगीते या माध्यमातून लोकांसमोर आली परंतु मनाला भुरळ घालणाऱ्या यादीत यापैकी क्वचितच काही गीते असतील. नवी गाणी वाजतात पण गाजत नाहीत. पूर्वी लोकांकडे माध्यमे कमी होती. त्यामुळे गाणी ऐकून पाठ व्हायची. आता यूट्यूबमुळे प्रेक्षकांना भांडार खुले झाले आहे. एखादे गाणे अर्धवट ऐकून लगेच दुसऱ्या गाण्याकडे लोक वळतात. यामुळे गाणी वाजतात, लोकप्रियताही मिळते पण गाजत नाहीत. लोकांच्या मनात घर करण्यास ती असमर्थ ठरतात,’ असे कृणाल म्युझिक कंपनीचे जयेश वीरा यांनी सांगितले.

‘कोलीवूड’ या निर्मिती संस्थेचे युवा निर्माते प्रवीण कोळी हा वारसा पुढे नेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. जुन्या कोळीगीतांप्रमाणे नवी गाणीही सातासमुद्रापार जावी असा त्यांचा मानस आहे. ‘जुन्या कलाकारांनी आमच्या पिढीपर्यंत पोहोचवलेले काम अजरामर आहे. त्यामुळे आता आमच्या पिढीवरही तितकीच दर्जेदार गाणी तयार करण्याची जबाबदारी आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत, पण ती गीते पारंपरिक कोळी गीते होती आणि ती त्या काळातील लोकांना भावलीही. आताच्या तरुणाईला अधिक ठेका असलेली, पाश्चात्य वाद्यांची जोड दिलेली, रिमिक्स पद्धतीची गाणी ऐकायला आवडतात. त्यामुळे पारंपरिक गीते तयार केली तर त्याला फारशी पसंती मिळत नाही. म्हणून मूळ गीतांची पारंपरिकता कायम ठेऊन त्याचे स्वरूप आणि मांडणी बदलून नवे काहीतरी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अर्थात त्याला मनासारखे यश मात्र मिळत नाही. कारण यूट्यूबमुळे गाणे जगभर पोहोचते खरे पण ते प्रत्येकाला भावतेच असे नाही. याची सकारात्मक बाजू इतकीच लोकप्रियता मिळत नसली तरी गाणे अधिकाधिक लोकांकडून ऐकले जाते, ज्यातून आपल्याला उत्पन्न मिळते. मात्र जुन्या गीतांची उंची गाठण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे,’ असे मनोगत प्रवीण कोळी यांनी व्यक्त केले.

नवी गाणी लोकप्रिय करण्यात प्रेक्षकांचाही सहभाग असतो. सध्या मराठी तरुण प्रेक्षकांना पंजाबी, हिंदी, इंग्रजी गाण्यांचे वेड अधिक आहे. पण आपलीही लोकगीते, कोळीगीते ऐकण्यासारखी आणि वाखाणण्यासारखी आहेत याची दखल आपल्याच प्रेक्षकांनी घेतली तर नवी गाणीही काळजात घर करतील. गेल्या काही वर्षांत आलेली अशी अनेक नवी गीते प्रेक्षकांच्या ओठावर घट्ट बसली आहेत. पुढेही असे होईल, असे नव्या कोळी गीतकारांचे आणि संगीत दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.

बदलते अर्थकारण

पूर्वी कॅसेट आणि सीडीच्या काळात गाणे प्रकाशित झाल्यानंतर ते लोकप्रिय होण्याची वाट पाहावी लागत असे. मग मागणी वाढली तर विक्री व्हायची. त्यातही विक्रीचे पैसे कधी येतील याचा भरोसा नव्हता. आता मात्र अर्थकारण बदलले आहे. यूट्यूब हे महत्त्वाचे माध्यम झाल्याने गाणे तिथे प्रकाशित करण्यास प्राधान्य दिले जाते. या माध्यमावर क्षणार्धात लाखो प्रेक्षक मिळतात. त्याचे पैसेही आपल्याला तातडीने मिळतात. त्यामुळे हे अर्थकारण पूर्वीपेक्षा अधिक सकस आणि परवडण्याजोगे असल्याचे गीत निर्मात्यांनी सांगितले.

शब्दांना महत्त्व यायला हवे…

‘जुनी गाणी आजही आपल्या स्मरणात राहतात कारण त्या गीतांच्या चाली जितक्या श्रवणीय होत्या तितकेच शब्दांना महत्त्व दिले जात होते. त्या दिग्गज गीतकारांनी लिहिलेले शब्द आजही आपल्याला भावतात. हल्लीच्या गाण्यांमध्ये याच शब्दमाधुर्याची कमतरता जाणवते. म्हणजे नवोदित गीतकारही गाणी लिहीत आहेत पण ते शब्द मनाला भिडणारे नसल्याने प्रभाव कमी पडतो. शिवाय नव्या पिढीला पाश्चाात्त्य गीतांची जास्त भुरळ पडत असल्याने याचा परिणाम आपल्या कोळीगीते, लोकगीते यावर होतो,’ असे सुमित म्युझिक कंपनीचे सुभाष परदेशी यांनी सांगितले.

दिनमहात्म्य

मुंबईचे भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगरी-कोळी समाजातील ‘नारळी पौर्णिमा’ हा महत्त्वाचा उत्सव. ज्या दर्यासागरावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा समाज नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा क रतो. ‘नारळाच्या करंज्या’ हा गोडाचा पदार्थ, नैवेद्य घेऊन आगरी-कोळी बांधव सहकुटुंब बोटीची पूजा करतात. संध्याकाळी मानाचा नारळ घेऊन वाजतगाजत मिरवणूक काढली जाते व तो नारळ समुद्राला अर्पण केला जातो. या उत्सवात कोळीवाड्यात गाणी, नाच असे उत्साहाचे वातावरण असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Folklore koli songs mumbai yesterday today at rasikachya lagnat akp