ललिता पवार हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येते ती कठोर आई किंवा खाष्ट सासूच्या भूमिकेत असणाऱ्या ललिता. त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहेत. अनेकदा ललिता यांना त्यांच्या भूमिकेमुळे शिव्याही खाव्या लागल्या आहेत. पण प्रेक्षकांनी दिलेल्या शिव्या याजणू त्यांच्या उत्कृष्ट कामाची पोचपावती होती. त्यांचा अभिनय होताच तसा.. त्या खरंच आपल्या सुनेचा छळ करत आहेत असेच वाटायचे. त्यांनी खाष्ट सासूच्या अशा अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, ज्या पाहून लोक क्रूर सासू कशी असते यासाठी ललिता यांचेच उदाहरण द्यायचे. आज ललिता पवार आपल्यात नाहीत पण आजही टीव्हीवर त्यांचा एखादा सिनेमा लागला तर त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे चाहते तो सिनेमा आवर्जुन पाहतात. आज लोकसत्ता ऑनलाइन तुम्हाला ललिता पवार यांच्या १०२ व्या जयंती निमित्त त्यांच्याबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. या गोष्टी वाचून त्या अभिनेत्री म्हणून किती सर्वोत्तम होत्या याचा प्रत्यय पुन्हा एकदा येईल.
ललिता यांनी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या शेकडो भूमिका केल्या. पण त्यांच्या नावाला आणि चेहऱ्याला खरी ओळक नकारात्मक भूमिकांमधूनच मिळत गेली.
ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी नाशिकच्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील लक्ष्मणराव सगुण व्यापारी होते. ललिता यांनी गणपतराव पवार यांच्यासोबत लग्न केले होते, मात्र दोघांनी काही वर्षांनी घटस्फोट घेतला. यानंतर ललिता यांनी निर्माता राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले.
ललिता यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली. १९२७ मध्ये आलेल्या पतित उद्धार या मुकपटात त्यांनी पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर त्यांच्याकडे अनेक सिनेमे येत गेले.
‘श्री ४२९’, ‘अनाडी’, ‘हम दोनों’, ‘आनंद’, ‘नसीब’, ‘दुसरी सीता’, ‘काली घटा’ यांसारख्या शेकडो सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. १९५९ मध्ये ‘अनाडी’ सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
त्यांनी फक्त सिनेमांमध्येच काम केले असे नाही तर रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत त्यांनी मंथराची भूमिका साकारली होती. वयाच्या ३२ व्या वर्षापासूनच त्यांनी चरित्रात्मक भूमिका स्वीकारायला सुरूवात केली होती.
फार कमी लोकांना माहित असेल की, ललिता पवार जेवढ्या उत्कृष्ट अभिनेत्री होत्या तेवढ्याच त्या चांगल्या गायच्याही. १९३५ मधील ‘हिम्मत ए मर्दां’ सिनेमातील त्यांनी गायलेलं ‘नील आभा में प्यारा गुलाब रहे, मेरे दिल में प्यारा गुलाब रहे’ हे गाणं तेव्हा फारच लोकप्रिय झालं होतं.
१९४२ मध्ये आलेल्या ‘जंग-ए-आझादी’ या सिनेमाच्या सेटवर एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान, भगवान दादा यांना ललिता पवार यांना कानाखाली मारायची होती. या दृश्यादरम्यान भगवान दादा यांनी जोरात कानाखाली मारली ज्यामुळे त्या खालीच कोसळल्या आणि त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले. यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला. ललिता पवार यांच्यावर तीन वर्ष उपचार सुरु होते. त्या बऱ्या तर झाल्या पण लकव्यामुळे त्यांना डावा डोळा गमवावा लागला. इतकंच नाही तर त्यांचा चेहराही कायमचा बिघडला.
डोळा खराब झाल्याने ललिता पवार यांचं हिरोईन होण्याचे स्वप्न कायमचे तुटले. पण सिनेसृष्टीत काम करण्याचा एक मार्ग बंद झाला असला तरी ललिता यांनी हार मानली नाही. या अपघातानंतरच सिनेसृष्टीला मिळाली बॉलिवूडची सर्वात खाष्ट सासू. ललिता यांनी आपल्या कारकीर्दीत जवळपास ७०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते.
१९९० मध्ये ललिता पवार यांना जबड्याचा कर्करोग झाला. यानंतर उपचारांसाठी त्या पुण्याला गेल्या. पण कर्करोगामुळे त्याचे फक्त वजनच कमी झाले नव्हते तर त्यांना स्मृतीभ्रंशही झाला होता. २४ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.