Manipur Violence: मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आणि पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी घडली होती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. याबाबत मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने प्रतिक्रिया दिली आहे.

मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून संतापला अक्षय कुमार; म्हणाला, “असे भयंकर कृत्य…”

“मणिपुर घटना!!!
कधी थांबणार हे आणि कसं?
सुन्न व्हायला होतं!
हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं? बाप रे!
इथं सोशल मीडियावर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती क्लिप आणि बातमी पसरतेय तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर?” असं हेमांगीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेतील चार आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये लोक रस्त्यावर उतरले असून अशांतता पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणात दोषींना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल. फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी मी करेन. मी लोकांना आवाहन करतो आहे की त्यांनी सुरक्षा दलांना अडवू नये,” असं बीरेन सिंह म्हणाले.