विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येऊ लागले आहेत. म्हणूनच बायोपिकचा ट्रेण्ड सध्या बॉलिवूडमध्ये गाजत आहे. क्रिकेटर्स, बॉक्सर्स, हॉकीपटू, बॅडमिंटनपटू यांच्या प्रेरणादायी कथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यामध्ये आता आणखी एका अनोख्या बायोपिकची भर पडणार आहे. प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे.
दमदार चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश झा या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. तर ‘अंदाज अपना अपना’चे निर्माते विनय सिन्हा आणि प्रिती सिन्हा याची निर्मिती करणार आहेत.
कोण आहेत वशिष्ठ नारायण सिंह-
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात राहणाऱ्या वशिष्ठ यांचा जन्म २ एप्रिल १९४२ रोजी जिल्ह्यातील बसंतपूर गावात झाला. नेतरहाट विद्यालयातून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. तल्लख बुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वशिष्ठ यांना पाटणा कॉलेजच्या प्रथम वर्षातच Bsc ऑनर्सची परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली होती. ज्यानंतर त्यांनी १९६९ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापिठातून Reproducing Kernels and Operators with a Cyclic Vector या विषयावर पीएचडी केली.
पीएचडीनंतर त्यांना नासामध्ये असोसिएट साइंटिस्ट प्रोफेसर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नोकरी मिळाल्याच्या पुढच्याच वर्षी १९७१मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांना वैवाहिक जीवनार फार काळ स्थैर्य लाभलं नाही. काही वर्षांनंतर ते पत्नीपासून विभक्त झाले आणि १९७२मध्ये भारतात परतले. भारतात आल्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले. पाच वर्षांनंतर त्यांना अचानक सीजोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रासले आणि त्यानंतर काही काळ ते बेपत्ता होते.
वशिष्ठ यांना कोणी गणित क्षेत्रातील देव समजत तर कोणी जादूगार. त्यांना या क्षेत्रात अशा काही सिद्धांतांचा आविष्कार केला जे आजही प्रचलित आहेत. एकेकाळी त्यांनी आइनस्टाइनच्या E= MC2 या सिद्धांतालाही आव्हान दिलं होतं.