गरीब वस्त्यांमधून वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे शुल्क वसूल करणे पालिकेसाठी डोकेदुखी होत असल्याने मीटर पाहून तात्काळ देयक देऊन तेथेच त्याची वसुली करण्याचा मार्ग पालिका अजमावून पाहणार आहे. त्यामुळे जलदेयक भरण्यासाठी रांगा लावणे तसेच ते भरले न गेल्यास दंड भरण्यातून ग्राहकांची सुटका होऊ शकेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रोज सुमारे साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. शहराच्या गरीब वस्त्यांमध्येही पालिकेकडून नळावाटे पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी जलदेयके भरण्यास उशीर होत असल्याचा पालिकेला अनुभव आहे. त्यावर उपाय म्हणून जागेवरच जलदेयके देता येतील का, त्याबाबत पालिका चाचपणी करत आहे. हा विचार प्राथमिक अवस्थेत असून व्यावहारिक पातळीवर तो कसा अंमलात आणता येईल, त्याबाबत विचार सुरू आहे, असे जलअभियंता रमेश बांबळे म्हणाले.  
ऑनलाइन प्रणालीचा त्यासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे. ही प्रणाली व्यवहारात आणल्यावर वॉर्ड कार्यालयातील अधिकारी किंवा जल अभियंता विभागातील अधिकारी मीटर पाहणी करून ऑनलाइन जलदेयक काढून देतील व त्याचा भरणा केल्यावर त्याच ठिकाणी पावती देण्याचीही व्यवस्था असेल.जल अभियंता खात्याचे इतर व्यवहारही ऑनलाइन करण्यासंबंधी विचारविनिमय सुरू आहे. जलजोडणी मागणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या अर्जाचा मागोवा ऑनलाइन घेता येईल. त्याहीपुढे जाऊन पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरचा जीपीआरएस प्रणालीवर आधारित माग घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to collect water bills door to door