विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ११४ जणांचे बळी गेलेल्या गोवारी समाजाची गेल्या २१ वर्षांत वेगवेगळ्या पातळीवर घसरण झाली असून राजकीयदृष्टय़ा ते कोणतेही फायदे पदरात पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे दरवर्षी शहीद गोवारी स्मारकाला हार घालून मेणबत्त्या जाळणे आणि विधानभवनावर शेकडोंच्या संख्येने मोर्चा आणणे असाच शिरस्ता राखला जात आहे. मात्र, शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्यांमधील प्रमाण आणि डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती यामुळे हा समाज भलताच पीछाडीवर गेला आहे.
मध्य भारतात गोवारी ही जमात प्रकर्षांने जाणवते. नागपुरात गोवारींची संख्या मोठी आहे. त्यांना गोंड-गोवारी नावाने संबोधले जायचे. गोंड आणि गोवारी मधील आडव्या रेषेने आजवर गोवारींचा घात केला आहे. ही आडवी रेषा काढून टाकून गोंड आणि गोवारी हे दोन शब्द स्वतंत्र करावेत, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. गोंडगोवारी ही बोलीभाषा असून ती जात नाही. गोंड आणि गोवारी या स्वतंत्र जमाती आहेत. गोंड राजे होते आणि गोवारी समाजाचे लोक त्यांची गुरेढोरे चारायचे.
ही गुरेढोरे गोवारींच्या मालकीची नव्हती. जसे धनगर हे जनावरांचे मालक आहेत तसे गोवारी हे कधीच मालक नव्हते. त्यामुळे ते आर्थिकदृष्टय़ा नेहमीच पीछाडीवर होते. त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याच्या हेतूने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधानभवनावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी दगावले आणि ५००च्यावर जखमी झाले. त्यावेळी बसलेल्या मानसिक धक्क्यातून कितीतरी गोवारी सावरलेले नाहीत, हे आजचे विदारक सत्य आहे. नोकऱ्यांमध्ये गोवारी समाजाचे उमेदवार मिळत नसल्याने इतरांना त्यांच्या जागी घेतले जाते. महाराष्ट्रात विशेष मागासवर्गीयात (एसबीसी) त्यांचा समावेश करण्यात आला आहे. एसबीसीसाठी केवळ २ टक्के आरक्षण आहे आणि त्यात ४२ जातींचा समावेश आहे. तेव्हा किती गोवारी समाजाचे विद्यार्थी शिक्षणात किंवा नोकऱ्यांमध्ये लाभ घेत असतील? केंद्र शासनाच्या लेखी गोवारींचा इतर मागास वर्गात (ओबीसी) समावेश आहे.
मात्र, महाराष्ट्र शासनाने एसबीसीमध्ये समावेश करून गोवारींच्या जखमेवर मीठ चोळल्याची त्यांची भावना आहे. तेव्हा गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी गोवारी यावर्षी मोठय़ा संख्येने विधानभवनावर मोर्चा आणणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ गोंडगोवारी शब्दाची फोड व्हावी’
या संदर्भात आदिवासी गोवारी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष कैलास राऊत म्हणाले, २००३मध्ये गोंडराजगोंड शब्दाची फोड करून गोंड आणि राजगोंड अशी विभागणी करण्यात आली. त्याच धर्तीवर गोंडगोवारी शब्दाची फोड करून गोंड आणि गोवारी वेगळे करायला हवेत. समाजाच्यावतीने येत्या १४ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा आयोजित करण्यात आला असून त्यात फार मोठय़ा संख्येने विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून गोवारी लोक येणार आहेत. गोवारींची संख्या ३० ते ३५ लाखांच्या घरात आहे. त्यांचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशी आमची मागणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govari falling on all levels of society