ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा पाहता आजही आरोग्यविषयक सोयी सुविधा, आरोग्यावर होणारा खर्च या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. ग्रामीण भागात आरोग्यविषयक सोयी-सुविधा देताना तेथील आरोग्यविषयक जीवनमान सुधारावे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाने ‘आरोग्य बँक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत कामाला सुरुवात केली आहे. राज्य पातळीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून नाशिक येथे या उपक्रमास सुरुवात झाली आहे.
आरोग्य म्हणजे औषधे, सलाइन, दवाखाना, उपचार असा समज आहे. ग्रामीण भागात आजही इंजेक्शन घे बरे होईल, असा पर्याय दिला जातो. तात्पुरत्या स्वरूपात कधी दवाखान्यात जाऊन तर कधी मनानेच काही उपचार केले जातात. परंतु आरोग्यविषयक समस्यांच्या मुळाशी जाण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही.
ग्रामीण भागातील आरोग्याशी निगडित समस्यांच्या निवारणासाठी तळागाळातील लोकांसाठी व्यापक स्तरावर जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे. आजार होऊ नयेत यासाठी आरोग्य बँकेच्या माध्यमातून उपाययेजना, आरोग्य सुधारण्यासाठी पूरक उपाय, उपचारविषयक मार्गदर्शन, राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य योजनांची माहिती तसेच उपचारासंदर्भात आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यासाठी ज्या गावांमध्ये आरोग्य सेवांची जास्त गरज आहे अशा ठिकाणी आरोग्य विद्यापीठ संलग्नित विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या मदतीने रोगनिदान आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात येईल. ग्रामीण भागात आरोग्य बँकेसाठी विनामूल्य खोली उपलब्ध करून द्यावी, ही अपेक्षा असून सामाजिक बांधिलकी निधीतून यासाठी निधी मिळविण्यात येणार आहे. ही जबाबदारी आरोग्य मित्र सांभाळणार असून यासाठी ग्राम आरोग्य समिती सहकार्य करेल. आरोग्य मित्र म्हणून निवृत्त महिला आरोग्य सेविका, निवृत्त सैनिक, निवृत्त शिक्षक किंवा इतर कोणीही शिक्षित व्यक्ती काम करू शकेल.
विद्यापीठाच्या वतीने या संदर्भात आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यस्तरावर हा उपक्रम राबविला जाणार असून उपक्रमाची सुरुवात नाशिकमध्ये झाली आहे. टप्प्याटप्प्याने हा उपक्रम पुढील काळात विस्तारित होईल, असे विद्यापीठाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
आरोग्यमित्र शोधण्याचे काम सुरू
जिल्ह्य़ात आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आरोग्यमित्र शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच १८० इच्छुक स्वयंस्फूर्तीने उपक्रमाशी जोडले गेले असून आरोग्यमित्र म्हणून जुलै महिन्यात ते प्रशिक्षण पूर्ण करतील. पहिल्या टप्प्यात जिल्ह्य़ातील तीन ठिकाणी आरोग्य बँक कार्यान्वित होणार असून रुग्णांना उपचार तसेच मार्गदर्शन केले जात आहे. पुढील काळात राज्य पातळीवर ही संकल्पना विस्तारली जाईल.
-डॉ. कालिदास चव्हाण
(कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)