दहावी आणि बारावीच्या परीक्षा अर्जात आधार क्रमांक नोंदवण्याची सक्ती राज्यमंडळाने मागे घेतली आहे. मात्र आधार क्रमांक नसल्यास निकालापर्यंत आधार क्रमांक देण्याचे हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा अर्जात आधार क्रमांक नोंदवणे राज्यमंडळाने बंधनकारक केले आहे. गेल्या वर्षीपासून परीक्षा अर्जात आधार क्रमांक नोंदणीचाही रकाना देण्यात आला आहे. आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. हा क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरू द्यायचा की नाही याबाबत शाळांमध्येही संभ्रम निर्माण झाला. त्या पाश्र्वभूमीवर राज्यमंडळाने आधार क्रमांक देण्याची अट मागे घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांचा नोंदणी क्रमांक अर्जात नमूद करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्डासाठी नोंदणीही केलेली नाही त्यांना निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे हमीपत्र द्यावे लागणार आहे. मात्र आधार क्रमांक नाही म्हणून परीक्षेचा अर्ज भरण्यापासून विद्यार्थ्यांना अडवू नये अशा सूचना राज्यमंडळाने शाळांना केल्या आहेत. बारावीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २४ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विलंब शुल्क भरावे लागणार असून त्यासाठी २९ ऑक्टोबपर्यंत मुदत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar card number compulsory for ssc and hsc board exam