वेदांतील ज्ञानाचा केवळ अभ्यास करून न थांबता वेदांतील ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.
वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा संचालित कोथरूड येथील वेदभवनाच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राव बोलत होते. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, माजी खासदार व वेदभवनाचे विश्वस्त अण्णा जोशी, वेदभवनाचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसास, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन शर्मा आदी त्या वेळी उपस्थित होते.
राव म्हणाले,की समाज सध्या विविध प्रश्नांचा सामना करीत आहे. वेदांमध्ये असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी व्हावा. वेद व कृषी, वेद व गणित, वेद व अवकाश शास्त्र,वेद व आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान याचा अभ्यास आपल्या विद्यापीठातून करण्याची गरज आहे. अनेक विचारवंतांनी वेद हे मानवतेची फार मोठी ठेव असल्याचे म्हटले आहे. वेद हे शतको न् शतको अस्तित्वात असलेले नवल आहे. मानवतेचे कल्याण करण्यासाठी वेदाचे ज्ञान आज आवश्यक आहे.
वेदाचार्य घैसास गुरूजी वेदपाठशाळेच्या वतीने देण्यात येणारा ‘सरस्वती उपासना पुरस्कार’ औरंगाबाद येथील ‘संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान’ या वेदशाळेस या वेळी देण्यात आला. राज्यपाल  राव यांच्या हस्ते वेदमूर्ती दुर्गादास मुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वागत मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी केले. डॉ. सुदर्शन शर्मा यांनी प्रास्ताविक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saraswati upasana award to sant dnyaneshwar vedvidya pratishthan