अतुल सुलाखे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोदय, गांधीजी आणि विनोबा असे शब्द उच्चारले की स्वत:ला आधुनिक म्हणवणारा वर्ग या उभय नेत्यांच्या यंत्र-विरोधाचा आणि त्यांच्या भूतकाळात रमण्याचा हटकून उल्लेख करतो. तसा आरोपच होतो. हा आक्षेप पूर्णपणे चुकीचा आहे.

गांधीजी आणि विनोबा आपल्या कल्पनेपलीकडे आधुनिक होते याचे पुरावे त्यांच्या साहित्यात दिसतात. तथापि इथे आपल्याला विनोबांच्या आधुनिकतेला अनुकूल आणि तिला पुढे घेऊन जाणाऱ्या विचारसृष्टीचा परिचय करून घ्यायचा आहे. विनोबा मुळात आधुनिक व वैज्ञानिक वडील आणि आध्यात्मिक आई यांच्या सहवासात वाढले. त्यांचा पिंड शास्त्रज्ञाचा होता. परमेश्वर सर्वोच्च आणि त्यानंतर गणित हा त्यांच्यासाठी आदराचा विषय होता. हे वैज्ञानिक संस्कार त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रांमधे वापरले. जोवर आपण आध्यात्माला विज्ञानाची जोड देत नाही तोवर मानवाचा समग्र विकास होणार नाही ही त्यांची भूमिका होती. इतकेच नव्हे तर आजवर खरी धर्मस्थापना होऊ शकली नाही कारण विज्ञानाचा विकास झाला नव्हता. मानवी समाज एकाच पंखाने उडत (खुरडत) होता, असे त्यांचे प्रतिपादन होते.

‘आत्मज्ञान आणि विज्ञान’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. आत्मज्ञानाला विज्ञानाची जोड मिळत नाही तोपर्यंत त्यातील सिद्धांत सत्याच्या कसोटीवर उतरणार नाहीत. त्यांचे हे चिंतन दुसऱ्या महायुद्धापूर्वीच झाले होते.

विज्ञान हे राजकीय स्वार्थासाठी वापरले गेले तर मानवी समाजाची इतिश्री ठरलेली आहे, याची त्यांना जाणीव होती आणि ती हिरोशिमा व नागासाकीवरील अणुहल्ल्याच्या पूर्वीच झाली होती.

विज्ञान + राजनीती = सर्वनाश

विज्ञान + आत्मज्ञान ( अध्यात्म ) = सर्वोदय

या दोन सूत्रांमधे त्यांचे तत्त्वज्ञान दिसतेच शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय याचीही कल्पना येते. स्वार्थासाठी विज्ञान या वास्तवाशी आपला भावी मुकाबला आहे, या परिस्थितीचा स्वीकार करून विनोबांनी अध्यात्मशास्त्राचा विकास केला. एवढेच नव्हे तर तो विचार त्यांनी सामान्यजनांपर्यंत नेला. यासाठी भाषा वापरली ती भोळय़ा माणसांची.

विनोबांच्या कल्पनेतील आत्मज्ञान आणि विज्ञानाचा मेळ त्यांच्या ‘गीताई चिंतनिका विवरणासह’ या ग्रंथात पूर्णरूपात दिसतो.

देशात आत्मज्ञानाची आणि विज्ञानाची दीक्षा देत विनोबा आणि त्यांचे सहकारी पायपीट करत होते. सत्य, प्रेम आणि करुणेचा विचार पेरत होते. ‘िथक ग्लोबली, अ‍ॅक्ट लोकल’ आणि ‘एकीने रहा, नेकीने रहा,’ हे दोन मंत्र विनोबांनी अनुक्रमे भारतातील अभिजन आणि सामान्यजनांना दिले. भूदान, ग्रामदान, संपत्तीदान आदी गोष्टी शेवटी ग्रामजनांसाठी होत्या. त्याच वेळी त्यांनी खेडय़ांत जाऊन काम करण्याची इच्छा असणाऱ्या तत्कालीन आधुनिकजनांना कसे कार्य करायचे याचीही दिशा दाखवली. गांधीजींच्या विश्वैक्याच्या कल्पनेला विनोबांनी ‘जय जगत्’ म्हणत वास्तव रूप दिले. ‘जय जगत्’ म्हणजे ‘आध्यात्मिक जागतिकीकरण’ हेदेखील या निमित्ताने ध्यानात घ्यायला हवे. सर्वोदयायाचे हे रूप आधुनिक असेलही पण गांधीजींच्या आणि सर्वोदयी परिवाराच्या तंत्रज्ञानविरोधाचे काय करायचे? या प्रश्नालाही उत्तर आहे.

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave books acharya vinoba bhave zws