सृष्टी सेक्टर तीन को-ऑ. हाऊसिंग सोसायटी फेडरेशन, मीरा रोड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीरा-भाईंदर महापालिकेने बंधनकारक केले असल्याने नव्याने उदयाला येत असलेल्या अनेक इमारतींमध्ये पावसाळी पाण्याचे नियोजन करणारी व्यवस्था उपलब्ध आहे, त्यातील किती इमारतींमध्ये ही व्यवस्था आजही कार्यरत आहे हा संशोधनाचा विषय आहे. परंतु मीरा रोडच्या ‘सृष्टी सेक्टर तीन को-ऑ. हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ या गृहसंकुलातील रहिवाशांनी एकत्र येऊन पावसाळी पाण्याचे नियोजन करणारा प्रकल्प आपल्या संकुलात कार्यान्वित केला आणि तो यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. परिणामी हे संकुल आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे.

मीरा रोडमधल्या सृष्टी सेक्टर तीन या संकुलाची ओळखच सुशिक्षितांचे, उच्चशिक्षितांचे संकुल अशी आहे.  डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील असे समाजात मानाचे स्थान असलेल्या व्यक्ती या संकुलाचे सदस्य आहेत. संकुलात एकंदर वीस इमारती आहेत आणि त्यात ३४ विंग आहेत. ९६२ कुटुंब या संकुलात गेली २२ वर्षे एकत्रित रहात आहेत. येणारे प्रत्येक सण, सामाजिक उपक्रम, स्पर्धा अशा विविध माध्यमातून ही कुटुंबे एकमेकांशी बांधली गेली आहेत. संकुलातील मोकळ्या जागा, प्रत्येक इमारतीला स्वत:चे मैदान, बगिचा आणि हिरव्यागार झाडांनी सजलेल्या या संकुलातील वातावरण अतिशय शांत आहे.

संकुलातील इमारती बांधल्या गेल्यानंतर त्याची प्रत्येकाची स्वतंत्र सोसायटी स्थापन झाली, परंतु एकत्र राहिलो तर अधिक संकुलासाठी ते फायदेशीर ठरेल या विचाराने सर्व सोसायटय़ांचे मिळून फेडरेशन स्थापन झाले आणि त्याला सृष्टी सेक्टर तीन को-ऑ. हाऊसिंग फेडरेशन असे नाव देण्यात आले. प्रत्येक सोसायटीतील २८ सदनिकांवर एक असे प्रतिनिधी फेडरेशनवर घेण्यात आले आहेत. फेडरेशनची व्यवस्थापन समिती वीस सदस्यांची असून प्रत्येक इमारतीचा प्रतिनिधी या समितीत असेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. समितीच्या दर महिन्याला नियमितपणे बैठका घेतल्या जातात. संकुलातील समस्या, उपक्रम आदींवर यात योग्य ते निर्णय सर्व सहमतीने घेतले जातात. फेडरेशनचे लेखापरीक्षण नियमितपणे केले जात असून कारभार नियमानुसार चालत असल्याने लेखापरीक्षण अहवालात फेडरेशनला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. सोसायटीतील सर्व सदस्य उच्चशिक्षित असल्याने फेडरेशनचा कारभार अधिकाधिक पारदर्शक होण्यावर भर दिला जातो.

संकुलात सर्व जाती-धर्माचे लोक राहत असल्याने महाशिवरात्र, होळी, ईद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ख्रिसमस असे आपल्या देशातील काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतात साजरे केले जाणारे सर्व सण, उत्सव तेवढय़ाच उत्साहाने साजरे केले जातात, शिवाय २६ जानेवारीला लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वासाठी बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलिबॉल, क्रिकेट आदी खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. वरिष्ठांसाठी असलेल्या समाजमंदिरात त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर असे सामाजिक उपक्रमही पार पाडले जातात. संकुलातील सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, घरकाम करणारे आदींच्या आरोग्यासाठी खास आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. शिवाय योगाभ्यास, व्यायामशाळा, तरणतलाव, स्क्व्ॉश आणि बिलीयर्ड यांसारखे खेळ आदी सुविधा उपलब्ध असणारा रिक्रिएशन क्लब सदस्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचीही काळजी घेतो. संकुलात होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक घडामोडींची इत्थंभूत माहिती संकुलातील सदस्यांना व्हावी यासाठी सृष्टी स्कूप हे मासिक फेडरेशनकडून दर महिन्याला प्रसिद्ध करण्यात येत असते. संकुलात राजकारणाला आणि बाहेरील राजकीय व्यक्तींना स्थान नाही, मात्र संकुलातील सदस्य राजकारणात सक्रिय असेल तर मात्र त्याला सदस्यांकडून मनापासून साथ देण्यात येते.

संकुलाच्या सुरक्षेचीदेखील तितकीच काळजी घेण्यात आली आहे. सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, शिवाय मुख्य प्रवेशद्वारावर आणि प्रत्येक इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. इमारतीमध्ये प्रवेशदेखील बायोमेट्रिक पद्धतीने दिला जातो.

सुरुवातीच्या काळात संकुलाला महानगरपालिकेडून करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठय़ावरच अवलंबून राहावे लागत होते, परंतु शहराची लोकसंख्या वाढू लागली तसे पाणीदेखील कमी येऊ लागले, वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. लाखो रुपये टँकरवर खर्च होऊ लागले. यावर उपाय पाण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार सदस्यांनी केला आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करणारा प्रकल्प बसवण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला काही लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प कार्यान्वित केला. संकुलाला महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्यापेक्षा शुद्ध पाणी या प्रकल्पातून मिळत आहे, अशी माहिती संकुलाचे सदस्य अनिल सावंत यांनी दिली. आज टँकर तर मागवावा लागतच नाही, उलट संकुल पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे. पाण्याचे नियोजन करणारे प्रकल्प राबवणाऱ्या रहिवासी सोसायटय़ांना त्यांच्या मालमत्ता करात पाच टक्के इतकी सवलत देण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे, परंतु संकुलाने वेळोवेळी अर्ज करूनही ही सवलत अद्याप देण्यात आलेली नाही. संकुलाकडून महापालिकेला तब्बल ६५ लाख रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त होत असतो. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेबाबत खंत असली तरी त्यामुळे संकुलातील सदस्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही, अशी माहिती सावंत देतात. फेडरेशनचे अध्यक्ष डॉ सुरेश सेहगल आणि त्यांचे रॉनी वाझ, मधु मेनन, विनय सक्सेना, हिमेश शहा, धरम सिंह, डॉ राजपूत आदी सहकारी सातत्याने संकुलासाठी धडपडत असतात. मालिनी वाझ, मनजित कौर, वंदना सक्सेना, नूर खान आदी महिलांची फळीही सातत्याने संकुलासाठी काही ना काही उपक्रम राबवत असते.

महानगरपालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या आवाहनाला संकुलाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संकुलातील सुमारे ७५ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. संकुलाचा संपूर्ण आसपासचा परिसर ना फेरीवाला क्षेत्र करून घेण्यात आला आहे. त्यांमुळे संकुलाच्या अवतीभोवती एकही फेरीवाला दिसून येणार नाही. परंतु संकुलापासून काही अंतरावर रस्त्यावरच फेरीवाले बसत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास नेहमी जाणावत असतो. संकुलाबाहेरील रस्त्यावर सोनसाखळी चोरीचे प्रसंगही अनेकवेळा घडले आहेत. संकुलापासूनच काही अंतरावरून जाफरी खाडी हा नाला वाहतो. महापालिकेकडून त्याची नियमितपणे सफाई केली जात नसल्याने त्यात नेहमी गाळ साचून राहतो. परिणामी संकुलातील काही इमारतींना दरुगधी आणि डासांच्या समस्येचा सामना करावा लागतो.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrishti society mira road water planning