आषाढी वारीनिमित्त प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (दि.१७) जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूमध्ये येऊन दर्शन घेतले. सध्याच्या करोना संकटामुळे वारीचे स्वरूप बदलल्याचे सांगताना करोना आणि पर्यावरणामुळे मानवाचे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. तसेच तुकोबारायांनी आपल्याला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असा संदेश दिलाय तर ज्ञानोबा माउलींनी ‘वृक्ष लावा आणि जलाशय वाढवा’ असं सांगताना महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की झाडांसमोर नतमस्तक व्हा. त्यांना मिठी मारा त्यातच तुम्हाला विठ्ठ्लाचं दर्शन होईल, असंही ते यावेळी म्हणाले.