कुर्ला बेस्ट अपघाताची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये असाच एक भीषण अपघाच घडला आहे. टेम्पो चालकाने गाडी थेट भाजी मार्केटमध्ये घुसवून पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केटमध्ये शुक्रवारी (२७ डिसेंबर) ही घटना घडली. या घटनेत प्रीती रितेश पटेल महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.तर रेश्मा शेख, मारूफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी आहेत.या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चिराग नगर मार्केट मध्ये शिरतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाजारात आलेल्या पाच जणांना चिरडले. स्थानिकांनी जखमींना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले.घटनास्थळी घाटकोपर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतलं आहे.रात्री उशिरापर्यंत या बाबत पोलिसांचा तपास सुरू होता.