देशात खऱ्या अर्थाने प्रगती साधण्यासाठी शेतीच्या सर्वच क्षेत्रांत संशोधन झाले पाहिजे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, तसेच पारनेर येथील न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इन्स्पायर कार्यशाळेचे उद्घाटन गुरूवारी देशमुख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे होते. बाबासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, संस्थेचे विश्वस्त रामचंद्र दरे, सीताराम खिलारी, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य सुधाकर शिंदे, समन्वयक डॉ. सुधीर वाघ आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, शास्त्र शाखेच्या अभ्यासामधून मिळणारे समाधान मोठे असते, त्या समाधानापुढे पैसा गौण आहे. त्यासाठी जेवढे काम व्हायला हवे होते ते झाले नाही. या क्षेत्रात आपण फार मागे आहोत. शास्त्रज्ञांकडून अशक्यप्राय गोष्टींची अपेक्षा ठेवल्यास काहीतरी चांगले हाती येईल हे लक्षात घेऊन यापुढील काळात काम झाले पाहिजे. देशात हरीतक्रांती झाली, संकरीत बियाणे आली, त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली. मात्र, उत्पन्न वाढले तरी आपण गरीबच आहोत. शेतकरी आहे त्याच घरात राहतो. पूर्वीचा श्रीमंत शेतकरी आता सामान्य शेतकरी झाला आहे, तर त्यावेळचा सामान्य शेतकरी आता गरीब झाला आहे. मग अन्नधान्य उत्पादनात वाढ होऊन उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला. शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याची आग्रही मागणी करतानाच डॉ. देशमुख यांनी केंद्र सरकारच्या एफटीआय धोरणाचे स्वागत केले. आज शेतकरी नागवला जात आहे, एफडीआयच्या अंमलबजावणीनंतर शेतकऱ्यांचा निश्चित फायदा होईल, असे ते म्हणाले. डॉ. किसनराव लवांडे, रामचंद्र दरे, जी. डी. खानदेशे यांचीही यावेळी भाषणे झाली. समन्वयक डॉ. सुधीर वाघ यांनी या शिबिरामागची भूमिका विषद केली. डॉ. रंगनाथ आहेर यांनी प्रास्ताविक व प्रा.  सुधाकर शिंदे यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farming reserch is needful for development dr deshmukh