केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून राज्यात दोन विधी विद्यापीठे स्थापन करण्याचा विचार सरकारस्तरावर सुरू आहे. यातील एक विधी विद्यापीठ नगरला व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी न्यू लॉ कॉलेजमधील विद्यार्थी, तसेच अन्य काही विद्यार्थ्यांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे केली.
माजी आमदार दादा कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तेजस्वी तवले, अश्विनी पठारे, तसेच गणेश शेंडगे, राहुल रासकर, प्रदीप ढाकणे, केदार भोपे, रोहित भंडारी आदी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात पाचपुते यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. राज्य सरकार प्रस्तावित करणार असलेल्या दोन विधी विद्यापीठांपैकी एक नगरला स्थापन करावे, अशा मागणीचे निवेदन त्यांनी पाचपुते यांना दिले. राज्यात सध्या एकही विधी विद्यापीठ नाही. त्यामुळे पदवी, तसेच पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांशी राज्यातील विधी महाविद्यालये संलग्न आहेत. राज्यात कृषी, वैद्यकीय या क्षेत्रासाठी स्वतंत्र विद्यापीठे आहेत. शेजारच्या आंध्र, तसेच अन्य राज्यांत स्वतंत्र विधी विद्यापीठे असल्याने तेथील विधी शिक्षणाचा स्तर उंचावला आहे. सध्या जिल्ह्य़ात ५ विधी महाविद्यालये आहेत. त्यामुळे नगरलाच हे विद्यापीठ आणावे, अशी मागणी त्यांनी केली. पाचपुते यांनी त्यांना यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For university the expectation send towards union minister