परीक्षा विभागातील नाटय़ संपेना..
गेले काही दिवस विविध गोंधळांनी गाजणाऱ्या परीक्षा विभागामध्ये आता नव्या नाटय़ाची निर्मिती झाली आहे. ‘आमच्या बदल्या करा. आम्हाला या विभागात काम करायचे नाही,’ अशी भूमिका परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतली असून कुलगुरूंनी विभागातील कर्मचाऱ्यांशी गुरूवारी संवाद साधला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी ‘आम्हाला येथे काम करायचे नाही, आमच्या बदल्या करा,’ अशी मागणी करणारे पत्र कुलगुरूंना दिले. या पत्रावर विभागातील नव्वद कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. परीक्षा विभागामध्ये घेतले जाणारे काही निर्णय अमान्य असल्यामुळे, तसेच घडणाऱ्या घडामोडींसाठी विभागातील कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे पत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विभागातील तीन कर्मचाऱ्यांची बदली केली. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात येणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र अजूनपर्यंत बदल्या झाल्या नाहीत. याबाबत परीक्षा आणि पदवीप्रदान समारंभ होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, अशी मागणी परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनीच केल्याची चर्चा विद्यापीठात होती.
 मात्र, आता विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे विद्यापीठ प्रशासनापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make our transfers