5G Launch In India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी 5G चे फायदे आणि ही सेवा भारतात कशा प्रकारे क्रांती घडवून आणेल, यावर भाष्य केले. तसेच आजच्या तारखीची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांत होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – संपूर्ण देशात 5G सेवा कधी उपलब्ध होणार? मुकेश अंबानी म्हणतात…!
”आम्ही सत्तेत आल्यानंतर देशात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. आम्ही डिजीटल भारत ही संकल्पना सुरू केली. त्याचा परिणाम आज भारत तत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होतो आहे. आधी 2G, 3G आणि 4G साठी भारत इतर देशांवर अवलंबून होता. मात्र, आता 5G तंत्रज्ञानाने भारताने दूरसंचार क्षेत्रात जागतिक मानकं स्थापित केली आहेत.”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
”डिजिटल वापरावर भर देण्याबरोबच आपण उपकरणांच्या किंमती आणि डेटाच्या किंमतीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. २०१४ पर्यंत आपण १०० टक्के मोबाईल आयात करत होतो. मात्र, आता देशात २०० मोबाईल युनिट निर्मिती केंद्र तयार करण्यात आले आहे. भारतात २०१४मध्ये २५ कोटी इंटरनेट युजर्स होते, हा आकडा आता ८५ कोटींवर पोहोचला आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच आता 5G तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, एअरटेल, जीओ सारख्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 5G चे प्रात्याक्षिक दाखवले. यावेळी त्यांनी ‘जिओ-ग्लास’सह इतर 5G उपकरणांची पाहणी केली. तसेच एंड-टू-एंडचे स्वदेशी तंत्रज्ञानही समजून घेतले.