पाटणा : इतर पक्षातून नेत्यांना पक्षात प्रवेश देणे हा भ्रष्टाचार नाही का? असा सवाल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपचे नाव न घेता विचारला आहे. संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली. जे आपल्याबरोबर आहेत ते सदाचारी, जे धोरणांविरोधात आवाज उठवतील ते भ्रष्टाचारी, अशी यांची नीती आहे, असा टोला नितीशकुमार यांनी भाजपला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात भाजपविरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी एकजूट दाखवल्यास भाजपला पराभूत करता येईल, असे नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. नितीशकुमार हे ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान दिल्लीत जाणार आहेत. या दौऱ्यात ते सहा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील, असे संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून आमचा पक्ष नितीशकुमार यांचे नाव पुढे आणणार नाही, असे त्यागी यांनी सांगितले.

नितीशकुमार दखलपात्र नाहीत : भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत ५० जागांच्या आत रोखण्याचे स्वप्न नितीशकुमार पाहात आहेत. मात्र त्यांची दखल घेण्यासारखी स्थिती नाही अशी टीका भाजपने केली आहे. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियेत जनता नितीशकुमार यांना गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who speak against bjp are bhrashtachari says bihar cm nitish kumar zws