विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (आरसीबी) पुन्हा एकदा आयपीएलच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आरसीबीला ४ गड्यांनी धूळ चारत स्पर्धेबाहेर ढकलले. आरसीबीचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकीपटू सुनील नरिनने घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर कोलकात्याने बंगळुरुला २० षटकात ७ बाद १३८ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात कोलकाताने हे आव्हान गाठण्यात आपले ६ फलंदाज गमावले, पण शुबमन गिल आणि नरिन यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्यांना विजय मिळवता आला. नरिनला सामनावीर पुरस्कार मिळाला. विराटचा हा आरसीबीचा कप्तान म्हणून शेवटचा सामना ठरला. कोलकाताला आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्शी भिडावे लागणार आहे. १३ ऑक्टोबरला हा सामना याच मैदानावर होईल.
कोलकाताचा डाव
व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी कोलकातासाठी चांगली सुरुवात केली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने शुबमनला चकवले. डिव्हिलियर्सकडे झेल देऊन तो माघारी परतला. शुबमनने ४ चौकारांसह २९ धावा केल्या. सातव्या षटकात कोलकात्याने राहुल त्रिपाठीला गमावले. बंगळुरुचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने त्याला पायचीत पकडले. त्रिपाठीला फक्त ६ धावा करता आल्या. त्यानंतर नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यरने भागीदारी रचली. १० षटकात कोलकात्याने २ बाद ७४ धावा केल्या. ११व्या षटकात हर्षल पटेलने सलामीवीर व्यंकटेश अय्यरला माघारी पाठवले. अय्यरला २६ धावा करता आल्या. हर्षलने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमात ड्वेन ब्राव्होची बरोबरी साधली. ब्राव्होने २०१३मध्ये ३२ बळी घेतले होते. अय्यर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सुनीन नरिनने ख्रिश्चनच्या ४ चेंडू १९ धावा कुटत कोलकात्याचे शतक पूर्ण केले. त्याने ख्रिश्चनच्या एका षटकात २२ धावा वसूल केल्या. हेच षटक बंगळुरुला महागात पडले. त्यानंतर कोलकात्याने नरिन आणि कार्तिकला गमावले, पण शाकिब अल हसन आणि कप्तान मॉर्गनने विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा – अर्जुनविरुद्ध खेळताना सचिननं कॅरमध्येही दाखवली जादू; VIDEO पाहून तुम्हीच म्हणाल, ‘‘बाप बाप होता है!”
बंगळुरुचा डाव
सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी बंगळुरुसाठी ४९ धावांची सलामी दिली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने देवदत्तला त्रिफळाचीत केले. देवत्तने २१ धावा केल्या. ६ षटकात बंगळुरुने १ बाद ५३ धावा केल्या. देवदत्तनंतर अडखळत सुरुवात केलेला श्रीकर भरत १०व्या षटकात सुनील नरिनचा बळी ठरला. त्याला १४ चेंडूत ८ धावा करता आल्या. १० षटकात बंगळुरुने २ बाद ७० धावा केल्या. मॉर्गनने १३व्या षटकात चेंडू नरिनकडे सोपवला. त्याने बंगळुरुचा कप्तान विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. विराटने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. १४व्या षटकात बंगळुरुने शतक पूर्ण केले. पण पुढच्याच षटकात नरिनने गोलंदाजीला येत डिव्हिलियर्सची दांडी गुल केली. त्याला फक्त ११ धावा करता आल्या. आपल्या शेवटच्या षटकात नरिनने ग्लेन मॅक्सवेलला तंबूत धाडत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला. मॅक्सवेलला १५ धावा करता आल्या. नरिनने ४ षटकात २१ धावा देत ४ बळी टिपले. २० षटकात बंगळुरुने ७ बाद १३८ धावा केल्या. नरिनव्यतिरिक्त कोलकाताकडू लॉकी फर्ग्युसनने २ बळी घेतले.
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), डॅनियल ख्रिश्चन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, जॉर्ज गार्टन, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल.
चालू हंगामात बंगळुरू आणि कोलकाता तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. आरसीबी आणि केकेआर दरम्यान आयपीएलमध्ये एकूण २९ सामने खेळले गेले असून यात, केकेआरने १६ सामने जिंकले, तर आरसीबीने १३ वेळा विजयाचा झेंडा फडकवला. मात्र, या दोघांमधील शेवटच्या पाच सामन्यांमध्ये बंगळुरू संघाने वर्चस्व राखले आहे.