ऋषिकेश बामणे, मुंबई
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील रांजणी खेडेगावातील काजल भोरने प्रतिकूल परिस्थितीला ‘खो’ देत उत्तुंग भरारी घेतली आहे. नुकताच तिने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई हा पुरस्कार जिंकून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
काजलचे वडील शेतात काबाडकष्ट करतात, तर आईला अपंगत्व आले आहे. सात बहिणींपैकी सहा जणींचा विवाह झाला आहे. परंतु १९ वर्षीय काजल डगमगली नाही, तर तिने खो-खो खेळात स्वत:ची ओळख निर्माण केली. यातून मिळणाऱ्या बक्षिसांच्या बळावर ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे.
‘‘कारकीर्दीत प्रथमच राणी लक्ष्मीबाई पुरस्कारासाठी माझे नाव जाहीर करण्यात आले, त्यावेळी मला अश्रू अनावर झाले. त्याशिवाय आमच्या नरसिंह क्रीडा मंडळातील पुरस्कार मिळवणारी मी पहिलीच खेळाडू असल्यामुळे मला अत्यानंद झाला,’’ अशी प्रतिक्रिया काजलने व्यक्त केली.
सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेणारी काजल वयाच्या ११व्या वर्षी खो-खो खेळाकडे वळली. आतापर्यंत विविध वयोगटांतील १४ राष्ट्रीय स्पर्धामध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून, या प्रत्येक वेळी राज्याने विजेतेपद मिळवले आहे. सुरुवातीच्या काळाविषयी विचारले असता काजल म्हणाली, ‘‘पाचवीमध्ये नरसिंह विद्यालयात प्रवेश घेतल्यावर तेथील मैदानावर मी नेहमी इतर मुलींना खो-खो खेळताना पाहायचे. त्यामुळेच या खेळाची आवड निर्माण झाली. पुढे संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी खो-खोचे धडे गिरवले. घरातल्यांनीदेखील मला पाठिंबा दिल्यामुळे नववीत असताना मी कारकीर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली.’’
आठवीमध्ये असताना काजलने आर्थिक अडचणींमुळे काही काळासाठी खो-खो खेळ थांबवला होता. परंतु प्रशिक्षकांनी वडिलांची समजूत काढल्यानंतर काजलने पुन्हा एकदा मैदान गाठले व तेव्हापासून तिच्या प्रगतीचा अश्वमेध वेगाने धावत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न काजलने बाळगले आहे. त्याशिवाय आपल्या कामगिरीद्वारे खेडय़ापाडय़ातील अनेक मुलींना प्रेरित करण्याचे तिचे ध्येय आहे.
राष्ट्रीय स्पर्धेबाबत काजल म्हणाली, ‘‘या स्पर्धेसाठी महेश पालांडे यांनी आमच्याकडून सांगली येथे झालेल्या शिबिरात विशेष सराव करून घेतला. त्याशिवाय स्वत:ची ताकद अंतिम क्षणासाठी कशी राखून ठेवावी, हेदेखील त्यांनी शिकवल्यामुळे स्पर्धेत आम्ही विजेतेपद मिळवू शकलो.’’