दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ३ कसोटी सामन्यांची मालिका भारतीय संघाने सध्या २-० अशा फरकाने गमावली आहे. या मालिकेतला अखेरचा कसोटी सामना २४ जानेवारीरोजी खेळवला जाणार आहे. मात्र कसोटी मालिकेत पराभव झाला असला तरीही, वन-डे मालिकेत भारत जोरदार पुनरागमन करेल असा आत्मविश्वास भारताच्या श्रेयस अय्यरने व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“वन-डे मालिकेत जोरदार पुनरागमन करत आफ्रिकेला धक्का देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कसोटी मालिकेत आमचा पराभव झाला असला तरीही वन-डे संघात महेंद्रसिंह धोनी पुनरागमन करत असल्याने संघासाठी ही सकारात्मक गोष्ट ठरेल. याआधी धोनीने कठीण परिस्थितीत भारताची नौका सांभाळलेली आहे. त्यामुळे वन-डे मालिका जिंकण्याचं ध्येय सध्या आमच्यासमोर असणार आहे.” कोलकात्यावरुन पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना अय्यर बोलत होता.

अवश्य वाचा – कसोटी पराभवाची बीसीसीआयकडून गंभीर दखल, क्रिकेट प्रशासकीय समिती चाचपणी करणार

पायाच्या दुखापतीमधून सावरलेला श्रेयस अय्यर वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पंजाबविरुद्ध खेळताना श्रेयसने आपल्या फलंदाजीची कमालही दाखवून दिली होती. आपल्या या खेळीचा आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी खूप मोठा हातभार लागणार असल्याचंही श्रेयसने मान्य केलं. दुखापतीच्या काळात आपण आफ्रिकेतल्या जुन्या सामन्यांचे सर्व व्हिडीओ पाहून फलंदाजीसाठीची प्राथमिक तयारी केली असल्याचंही श्रेयस म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will bounce back in odi series against south africa says shreyas iyer