|| दीपक घारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतात पिकणारा कापूस मानवासाठी सुखाचा धागा आहे. अशा या कापसाची सरकीपासून सुतापर्यंतची बहुपदरी कथा राजीव जोशी यांच्या ‘कापूस’ या पुस्तकात आलेली आहे. सुरुवातीच्या ‘पेर्ते व्हा’ या मनोगतात कवीच्या संवेदनशील वृत्तीनं राजीव जोशी कापसाशी असलेलं त्यांचं भावनिक नातं सहजपणे सांगतात. त्यात स्मरणरंजन आहे, तसंच बहिणाबाई, मर्ढेकरांच्या उदाहरणांमधून येणारे सांस्कृतिक संदर्भही आहेत. मात्र, उर्वरित पुस्तक मुख्यत: माहितीपर आहे. कापसाच्या जाती, त्यांचे गुणधर्म, भारतातील उत्पादन आणि अर्थव्यवस्थेतील त्याचा वाटा, शासकीय योजना अशा अनेक अंगांनी ही माहिती येते. आकडेवारीचे तक्तेही त्यात येतात. थोडक्यात सांगायचं, तर कापूस या विषयावरचं सर्वागीण विचार करणारं हे संदर्भ-पुस्तक आहे. कापसाच्या पेरणीपासून वस्त्रोद्योगापर्यंतच्या प्रवासाची कहाणी सांगणारा रंगीत छायाचित्रांचा विभागही यात आहे.

मोहेंजोदडोपासूनच भारतात कापूस आणि वस्त्रोद्योगाची जाण होती. प्राचीन ग्रीक आणि रोमन राजवटींमध्ये भारतातून कापडाची निर्यात होत होती. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात कापडनिर्मितीचा व्यवसाय भरभराटीला आला. १७ व्या शतकात ढाक्याची मलमल इंग्रजांनी भारतातून केलेल्या निर्यातीमुळे युरोपातही प्रसिद्ध झाली आणि फॅशनचा भाग बनली. इंग्रजांनी पहिली गिरणी १६३९ साली सुरत आणि मद्रास येथे सुरू केली. केरळमधल्या कालिकत बंदरातून थेट इंग्लंडशी कापडाचा व्यापार सुरू झाला आणि कालिकतवरून ‘कॅलिको’ नाव पडलं.

ब्रिटिश राजवटीत इंग्लंडला कापूस निर्यात करता यावा म्हणून भारतात कापसाच्या विविध जातींची लागवड करण्याचे आणि कापूस उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. अमेरिकी कापसाच्या जाती विकसित करण्यात आल्या. १९२१ मध्ये मुंबईत सेंट्रल कॉटन कमिटीची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर कापसाचं उत्पादन करणारा प्रदेश पाकिस्तानात गेल्यामुळे भारत सरकारनं उत्पादनवाढीच्या विविध योजना राबवल्या. आज भारतातलं कापसाचं उत्पादन जगात सर्वाधिक- म्हणजे जगातील कापूस उत्पादनाच्या २५ टक्के आहे. आज जैव तंत्रज्ञान वापरून कापसाचं उत्पादन केलं जात असल्यामुळे त्यात गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ झालेली आहे.

कापसाचं बीज म्हणजे सरकी. खाद्यतेल म्हणून सरकीला कापसाइतकंच महत्त्व आहे. प्राण्यांच्या खाद्यासाठीही त्याचा वापर केला जातो. कापसामागचं कृषिविज्ञान, कापसाची शेती व उत्पादन, कापसावरील प्रक्रिया, कापसाचा व्यापार आणि रोजगार, अर्थव्यवस्थेतील कापूस उद्योगाचा वाटा अशा सर्वागीण पद्धतीनं जोशी यांनी कापसाचं महत्त्व सांगितलं आहे.

या कापसाच्या कहाणीला थोडी राजकीय- सांस्कृतिक परिमाणांची जोड देणं आवश्यक आहे. भारत हा कापड निर्यात करणारा देश होता. पण औद्योगिक क्रांतीमुळे ब्रिटनमधील वस्त्रोद्योग वाढला. त्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी ब्रिटिशांनी भारतातून कापडाऐवजी कापूस आयात करायला सुरुवात केली. अमेरिकेतील यादवी युद्धामुळे अमेरिकी कापसाची निर्यात थंडावली आणि त्याचा फायदा भारतीय कापसाला मिळाला. त्यातून मुंबईत अनेक व्यापारी सधन झाले आणि मुंबईच्या विकासाला चालना मिळाली. मुंबईत सूतगिरण्या सुरू झाल्या आणि कोकणातून आलेल्या गिरणी कामगारांचा एक नवा वर्ग तयार झाला. स्वातंत्र्यलढय़ाचा एक भाग म्हणून महात्मा गांधींनी खादीची चळवळ सुरू केली, तीसुद्धा कापसाशी संबंधित होती.

आज खनिज तेल व पेट्रोलियमला जागतिक अर्थव्यवस्थेत जे महत्त्व आहे ते एकेकाळी कापूस आणि वस्त्रोद्योगाला होतं. कधी गरिबांचं वस्त्र म्हणून, कधी फॅशनचा भाग म्हणून, तर कधी राजकीय परिवर्तनाचं साधन म्हणून कापूस मानवी जीवनात केंद्रस्थानी राहिलेला आहे. ‘कापूस’ हे पुस्तक म्हणजे कापूस या विषयावरचं विश्वासार्ह माहिती पुरवणारं महत्त्वाचं संदर्भ-पुस्तक आहे.

‘कापूस : सरकीपासून सुतापर्यंत’

– राजीव जोशी,

राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- १६८, मूल्य- २५० रुपये.

gharedeepak@rediffmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang marathi article 8