दासू वैद्य dasoovaidya@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० जानेवारी १९४८.. या दिवशी एका महात्म्याला गोळ्या घालून देहरूपी संपविण्यात आले. गांधी त्याचं नाव. या दुर्दैवी घटनेची पंच्याहत्तरी आज सुरू होत आहे. गांधींचा देह त्या दिवशी संपला, परंतु त्यांची विचारधारा, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं अद्भुत, अविश्वसनीय आयुष्य आजही जगभरातील लाखो-करोडो लोकांना भुरळ घालते आहे.. आजच्या जगड्व्याळ समस्याग्रस्त जगात त्यांचे विचार दीपस्तंभासारखे लोकांना प्रकाश देत आहेत.

जरी आज त्यांना स्वत:च्याच देशात मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू असले, तरीही!

चाळीसेक वर्षांपूर्वी गावाकडच्या शाळेत वर्षांतले दोन दिवस फार उत्साहात साजरे व्हायचे. एक पंधरा ऑगस्ट आणि दुसरा सव्वीस जानेवारी. भल्या सकाळी झेंडावंदन. रंगीत पताकांनी सजलेली शाळा. गावातून प्रभातफेरी. खेळांचे सामने. आणि शेवटी केळी किंवा संत्री, गोळ्यावाटप. विस्तव ठेवून तापवलेला तांब्या शर्ट-चड्डीवर फिरवून इस्त्री केली जायची. असे नीटनेटके कपडे घालून मुरकणाऱ्या आम्हा पोरा-पोरींची गावातल्या गल्ल्यांतून प्रभातफेरी निघालेली असे. सर्वात पुढे ढोल वाजत असे. लेझीम पथकही पदन्यास करताना बेभान झालेले. त्यांच्यामागे वर्गनिहाय रांगेत जोरजोरात घोषणा सुरू असत. ‘भारऽऽऽत माताऽऽऽ की जयऽऽऽ’, ‘वंदेऽऽऽ मातरम्’, ‘एक रुपया चांदी काऽऽऽ देश हमारा गांधी काऽऽऽ’ लोक दारातून, खिडकीतून, माडीवरून, ओटय़ावरून कौतुकानं प्रभातफेरी पाहत. लोकांना पाहून आम्हीही चेकाळून जोरजोरात घोषणा द्यायचो. तेव्हा स्वातंत्र्य संग्रामाबद्दल फार तपशिलाने माहिती नसायची. पण ‘एक रुपया चांदी काऽऽऽ’ या घसा ताणून दिलेल्या घोषणेमुळे हा देश गांधींचा आहे याची पहिलीवहिली नोंद झाली. कदाचित गांधी नावाशी झालेली ही पहिलीच भेट होती. अख्खा देश ज्यांच्या नावावर चालतो, त्या गांधीजींचं नाव आपल्या शाळेला आहे याचा वेगळा अभिमान वाटायचा. गांधीजींचे संदर्भ पाठय़पुस्तकांतून येऊ लागले. हेच महात्मा गांधी कधी नोटेवर दिसू लागले. शाळेतल्या भाषणात लोकमान्य टिळकांच्या शेंगांची टरफलं, तरुण भगतसिंह-राजगरू-सुखदेवांचं फासावर लटकणं आणि गांधीजींची साधी राहणी- बकरीचं दूध- फुटलेली मधाची बाटली पुन्हा  पुन्हा अधोरेखित केली जायची. पण आम्हाला महात्मा गांधींची गोष्ट बऱ्यापैकी कळली त्याचं श्रेय रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधी’ चित्रपटाला द्यावं लागेल. अमिताभ बच्चनचा ‘मुकद्दर का सिकंदर’ लागोपाठ तीन शो पाहणारा मी ‘गांधी’ चित्रपटावरही तेवढाच लुब्ध होतो. ‘मुकद्दर का सिकंदर’मधला अमिताभ, त्याची हिप्पी कटिंग, डायलॉगबाजी, डाव्या हाताची मारामारी, गाणं.. असं सारं आवडायचं. ‘गांधी’त असं काहीच नव्हतं, तरी ‘गांधी’ चित्रपट खूप आवडायचा. कशामुळं, ते मात्र माहीत नाही. नंतर भारतीय महापुरुषांवर अनेक चित्रपट आले, पण बेन किंग्जलेच्या ‘गांधी’ला तोड नाही.

‘गांधी’ चित्रपटातील एक अबोल दृश्य एखाद्या कवितेसारखं स्मरणात आहे. या एका दृश्यातूनसुद्धा गांधीजींच्या अंतरंगाचं दर्शन होतं. आफ्रिकेतून १९१५ साली भारतात परतलेले गांधी सूट-बूट त्यागून साधा पंचा परिधान करू लागले. गुरुवर्य गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या आदेशावरून देश समजून घ्यायला भारतभ्रमण आरंभिलेलं. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास सुरू आहे. आडरानात एका नदीच्या पुलावर अचानक रेल्वे थांबते. रेल्वे ठप्प झाली म्हणून पाय मोकळे करायला लोकांबरोबर गांधीजीही खाली उतरतात. गांधीजी एकटेच पुलाखालच्या नदीवर येतात. नितळ, निर्मळ पाण्याची शांत नदी वाहतेय. निर्जन काठावर बसून गांधीजी पाण्याला स्पर्श करतात. त्या शांततेत समोरच्या काठावर गांधींबरोबर आपल्यालाही हालचाल जाणवते. समोर अपुऱ्या वस्त्रातील ग्रामीण स्त्री स्नान करीत असते. स्वाभाविकच पुरुषाला बघून ती स्त्री लाजते, संकोचते. पण शरीर झाकण्यासाठी त्या स्त्रीजवळ पुरेसं वस्त्र नाही. तिची घालमेल होते. गांधीजींच्या चेहऱ्यावर अपराधीभाव उमटतो. क्षणात गांधीजी स्वत:चा पांघरलेला पंचा पाण्यावर सोडतात. पंचा वाहत वाहत त्या स्त्रीजवळ जातो. कृतज्ञभावाने तो वाहत आलेला ओला पंचा घेऊन ती ग्रामीण स्त्री आपलं उघडं अंग झाकते. ही पडद्यावरची नि:शब्द कविता आपण पाहतच राहतो. कदाचित हा प्रसंग गांधीजींच्या जीवनात असाच घडलेलाही नसेल. दिग्दर्शकाचा कल्पनाविलासही असेल. पण या काव्यात्म प्रसंगातून भारतीय दारिद्य्राचं दर्शन घडतानाच गांधीजींच्या अंतरंगाची घडणही नेमकेपणाने उजागर होते.

आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स्व साजरा होत असताना गांधीजींची आठवण अपरिहार्य आहे. गोळ्या झाडून गांधीजींचा देह संपविण्यालाही पुढच्या वर्षी पंचाहत्तर वर्ष होतील. दरम्यान, पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं, तसं खूप पाणी थकून गेलं, सुकूनही गेलं. सत्ता आल्या, सत्ता गेल्या. गांधीजींना अपेक्षित असणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा जाळभाज सुरूच आहे. गांधीजींना गौरवान्वित करणारे, तद्वतच अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांचा तिरस्कार करणारेही विपुल ग्रंथ लिहिले गेले. वैश्विक पातळीवर खूप मोठय़ा प्रमाणात पुरस्कृत आणि तिरस्कृत झालेलं महात्मा गांधी हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. रोमाँ रोलाँ या नोबेलप्राप्त फ्रेंच लेखकाप्रमाणेच अनेक पाश्चिमात्त्यांना गांधीजी हा येशू ख्रिस्ताचा अवतार वाटे. रामनाम जपणारा येशू ख्रिस्त ही कल्पना भारी आहे. ‘गांधीजी ही हाडामासाची व्यक्ती नव्हती, तर कपोलकल्पित कथा आहे, असा काही शतकांनंतरच्या लोकांचा समज असेल,’ असे गौरवोद्गार अल्बर्ट आईनस्टाईनने काढले आहेत. गांधीजींची कार्यमग्नता, प्रयोगशीलता आणि विचारांचा आवाका विलक्षण होता. शौचाला शेतात कुठं, कसं बसावं इथपासून ते सत्तेत बसलेल्यांनी काय करावं, इथपर्यंत त्यांची स्वत:ची भूमिका होती.

आणखी वाचा – पडद्यावरचा न नायक!

गांधीजी तसे धोरणी होते. गोपाळ कृष्ण गोखले राजकीय गुरू असले तरी गांधीजींनी लोकमान्य टिळकांची वाट धरलेली होती. मुळात गांधी ही गाजावाजा व्हावा अशीच वादग्रस्त संहिता आहे. पण त्यांना स्वत:ला ‘गांधीवाद’ नावाचा मठ स्थापन करायचा नव्हता. त्याचे काही पुरावेही सापडतात. एकदा गांधीजींचा एक दात पडला. गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाईंनी श्रद्धेपोटी तो दात जपून ठेवला. पुढे कधीतरी बोलताना ही दाताची गोष्ट महादेवभाईंकडून गांधीपुत्र देवदासभाईंना कळली. उत्सुकतेने तो दात देवदासभाईंनी पाहिलाही. त्या दातावर महादेवभाई व देवदासभाई यांच्यात प्रेमाचा वादही झाला. मुलगा असल्यामुळे देवदासभाईंनी दातावर हक्क सांगितला. तेवढय़ात गांधीजी तिथे आले. त्यांनी दाताची कहाणी ऐकून घेतली. दोघांचाही दातावरचा अधिकार नाकारून त्यांनी आपला दात मागून घेतला आणि दूरवर भिरकावून दिला. स्वत:च्या दाताचे भविष्यातील भव्य दन्तमंदिर त्यांना नको होते. रशियात सुरक्षित ठेवलेल्या लेनिनच्या देहाचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करतात तशी गांधीजींच्या दन्तदर्शनासाठीही गर्दी झाली असती. पण गांधीजींनी ते होऊ दिले नाही. देशात सुरू असलेल्या स्मारकं, प्रतीकं, नामकरणाच्या राजकारणात गांधीजींची ही भूमिका दिशादर्शक ठरू शकते. महात्मापण डोक्यात न गेलेल्या गांधीजींच्या मते, ‘‘मी महात्मा म्हटला गेलो म्हणून माझे वचन प्रमाण आहे असे समजून कोणी चालू नये. महात्मा कोण हे आपल्याला माहीत नाही. म्हणून चांगला मार्ग हा की, महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्यावे आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करावा.’’ अशी दुर्मीळ असणारी स्वत:बद्दलची परखड भूमिका वर्तमान राजकारण्यांच्या अनिवार्य अभ्यासक्रमात ठेवण्याची वेळ आली आहे. अनेक प्रसंगांत गांधीजींची स्वत्वशोधाची विजेरी वाटेवरचा अंधार आजही दूर सारू शकते. तत्त्वनिष्ठा आणि भूमिकेची शुचिर्भूतता किती तळपती असू शकते, त्याची आच आजही आपल्याला जाणवते. चटके बसतात. नथुराम गोडसेची भूमिका करणाऱ्या नटाला स्पष्टीकरण द्यावं लागतं. अर्थात नथुरामचा समर्थक वर्गही सक्रिय असतोच. आजही गांधीजींच्या पोस्टरवर गोळ्या झाडल्या जातात. गांधीजींचं हे पुन्हा पुन्हा जिवंत होणं अद्भुत आहे. सुरुवातीपासूनच चरखा चालवून स्वातंत्र्य मिळविणे किंवा त्यांच्या साध्या साध्या आंदोलनांची शिक्षितवर्ग टिंगल करीत होता. याउलट, सर्वसामान्य माणसांना गांधीजींच्या साध्यासुध्या गोष्टींचं आकर्षण वाटत होतं. त्यातून गांधीजींच्या बाजूनं समाजमन तयार झालं. गांधीजींबद्दल नित्य नवे वाद निर्माण होतात. पण उभ्या बांधकामाच्या पायातला दगड उपसून काढता येत नाही, तसं गांधीजींना स्पष्टपणे नाकारणं कुणालाच परवडणारं नाही. गांधी हे एक महावस्त्र आहे. ते घालून प्रत्येकाला मिरवावं वाटतं. मग अंतर्वस्त्र (हेतू) कुठलंही असू देत. ज्या पीटरमारीट्झबर्ग स्टेशनवर अश्वेत म्हणून गांधीजींना डब्यातून ढकलून दिले, त्याच स्टेशनबाहेर महात्मा गांधींचा पुतळा सन्मानपूर्वक बसवण्यात यावा, हे चुकीचं प्रायश्चित तर आहेच; त्याचप्रमाणे गांधीविचारांची अपरिहार्यताही आहेच.

१९१५ साली गांधीजी आफ्रिकेतून भारतात येतात आणि १९२० ला टिळकांच्या मृत्यूनंतर देशातले सर्वोच्च नेतेही होतात. टिळकयुग संपून गांधीयुग सुरू होतं. कुठलाही राजकीय किंवा घराण्याचा वारसा नसताना अवघ्या पाच वर्षांत राष्ट्रीय नेतेपदी जाण्यामागचे रहस्य काय असेल? विरोधकांबरोबरच स्वकियांनाही गांधीजींची बऱ्याचदा अडचण झाली आहे. या राजकीय लोकांसाठी गांधीजी म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा अशीच अवस्था होती आणि आहेही. गांधीजींचं नाव वापरल्याशिवाय तर पान हलणार नाही; पण त्यांचे आदर्शवादी विचार पेलणारे नव्हते. गांधींचे आर्थिक तत्त्वज्ञान त्यांचे निकटतम सहकारी पं. नेहरू आणि सरदार पटेलांनाही मान्य नव्हते. नेहरूंच्या आवडत्या औद्योगिकीकरणाबद्दल गांधींचे आक्षेप होतेच. तशी गांधींच्या ग्रामस्वराज्याबद्दलही कुणाची सहमती नव्हती. नास्तिक नेहरू आणि तापट सरदार पटेलांना सोबत घेऊन चालणारे गांधीजी मात्र धार्मिक आणि समन्वयवादी होते. गांधींच्या अनेक गोष्टी मान्य नसूनही गांधींना मात्र नाकारता येत नव्हते. ही अपरिहार्यता गांधीजींच्या त्यागपूर्ण कर्तृत्वातून निर्माण झालेली होती. त्यामुळे गांधींचा हट्टीपणाही मान्यताप्राप्त ठरला. कुठल्याही प्रसंगात, आवश्यक असतानाही गांधीजींनी सोमवारचे मौनव्रत सोडले नाही. रेल्वेच्या डब्यात जागा नसतानाही रात्री झोपताना सूत कातण्याच्या व्रतात त्यांनी खंड पडू दिला नाही. विरोधकांच्या नजरेत गांधीजी दांभिक होते, नाटकी होते. पण या टीकेचा गांधीजींवर यत्किंचितही परिणाम झाला नाही. चुकांची कबुली देत देत गांधीजी आपले प्रयोग करीत राहिले. त्यामुळे त्यांचा सर्व वर्गात नैतिक दबदबा निर्माण झाला. गांधीजींना शिक्षा सुनावणारा ब्रिटिश न्यायाधीशसुद्धा गांधींचा उल्लेख ‘वंदनीय विभूती’ असा करून स्वत:चा नाइलाज नोंदवत होता. ‘गांधी’ ते ‘महात्मा’ हा प्रवास सर्वश्रुत आहे. पण ‘महात्मा’ ते ‘टकल्या’ अशी तिरस्कारयुक्त हेटाळणीही गांधींच्या वाटय़ाला आलेली आहे.

गांधी हे आजही चलनी नाणं आहे. बिकट परिस्थितीत गांधी हा सुवर्णमध्य आहे. याचं सांप्रत काळातील उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातलं उजेड हे गाव. या गावावर मधुकर कांबळे या मित्रानं उत्तम स्टोरी केली आहे. या गावात पूर्वी महादेवाची यात्रा भरायची. पण निझामी राजवटीत यात्रा बंद पडून मोईद्दीनसाब कादरी यांच्या नावानं उरुस भरू लागला. पोलीस अ‍ॅक्शनमध्ये निझामी राजवट खालसा झाली. रझाकारांचे अत्याचार थांबले. मराठवाडा स्वतंत्र झाला. उरुसही बंद झाला. गावात यात्राच भरेना. शेवटी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावात पुन्हा यात्रा भरवायचा निर्णय घेतला. पण यात्रा कुणाच्या नावानं भरवणार, हा मोठा पेच निर्माण झाला. गावकऱ्यांत एकमत होईना. शेवटी सुवर्णमध्य काढण्यात आला. सर्वाना चालेल असं नाव यात्रेला दिलं गेलं. १९५५ पासून महात्मा गांधींच्या नावानं यात्रा भरू लागली. आजही २६ जानेवारीला गांधीजींच्या नावानं इथे यात्रा भरते. करोनाच्या टाळेबंदीत सुजलेल्या महानगरांनी पोटार्थी ग्रामीण माणसांना हाकलून दिलं तेव्हा ही कामगार मंडळी पायपोळ करीत खेडय़ाकडेच गेली.. किंवा त्यांना खेडय़ाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या ग्रामस्वराज्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. त्यातलं शक्य आहे ते केलं पाहिजे.

आणखी वाचा – चतु:सूत्र : गांधीजींच्या जनआंदोलनांमागील भूमिका

काही वर्षांपूर्वी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधीजींच्या समाधीची तोडफोड करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. त्या तरुणाला पकडून अटक करण्यात आली. समाधीच्या कोपऱ्याचा संगमरवर तुटला होता. पोलिसाने त्या तरुणाची चौकशी केली. त्याचं समाधी फोडण्याचं कारण फार मजेशीर व वेगळं होतं. त्या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी मिळत नव्हती. बेकारीचा ताण अस झाल्यावर तरुणाने सारा राग गांधींच्या समाधीवर काढला होता. बाकी त्याचा काही वाईट हेतू नव्हता. म्हणजे त्या संगमरवरातही या अपरिहार्य रहस्याला आपण शांत झोपू देत नाही.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhiji s ideology life of mahatma gandhi mahatma gandhi philosophy zws
First published on: 30-01-2022 at 01:09 IST