महाराष्ट्र विधिमंडळाच्या मागील अधिवेशनानंतर राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे. याबाबत विचारलं असता प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रीपद मिळालं तरी घेणार नाही. मंत्रीपदाच्या शपथीचा कागद फाडून टाकेन, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं तुम्हाला वाटतं का? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “मी मंत्रिपदाचा दावाच नाकारला आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही भरत गोगावलेंना किंवा संजय शिरसाटांना विचारला पाहिजे. मी आता दावाच सोडला आहे तर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला कशाला विचारता? मंत्रीपद हा विषय मी माझ्या डोक्यातून कधीच काढून टाकला आहे.”

“बच्चू कडूंना कसल्याही मंत्रिपदाची गरजही नाही. ‘हम अकेलेही काफी है, सब संभालने के लिए.’आता मंत्रीपद मिळालं तरी घेणार नाही. मंत्रिपदाच्या शपथपत्राचा कागद फाडून टाकेन आणि चार तुकडे करेन,” असं थेट वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

हेही वाचा- दिशा सालियान मृत्यूप्रकरणी SIT स्थापन; सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, अमृता फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या…

दरम्यान, बच्चू कडूंनी विधानसभेत वंचित घटकांच्या बाजूने भूमिका मांडताना सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. यावेळी चालकांना कामगार दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली. “सगळ्या वाहनांच्या चालकांना कामगार दर्जा देणं गरजेचं आहे. गावागावांमधल्या भूमीहीन मजुरांसाठी योजना आखायला हव्यात. शेतकऱ्यांप्रमाणेच या भूमीहीन मजुरांसाठीही योजना करायला हव्यात. देशभरात ११ हजार शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तो मजूर आहे म्हणजे कामगार नाहीये का? तुम्ही यावर कधी विचार केला आहे का? आपण यावर विचार करणं फार गरजेचं आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu on cabinet expansion and minister post winter session 2023 rmm