दहा वर्षांत ४६ एटीएम फोडून लूट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नगर : जिल्ह्य़ात चोरटय़ांनी बँकांची एटीएम लक्ष्य केली आहेत. विशेषत: महामार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी निर्माण करण्यात आलेली एटीएमकडे लुटारूंनी लक्ष वळवले आहे. बँकांनी एटीएमच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना न केल्याने व लुटीत मोठी रक्कम हमखास हाती लागत असल्याने चोरटय़ांनी आपली गुन्हे करण्याची पद्धत बदलत एटीएमच्या लुटीचे सत्र अवलंबले आहे. गेल्या १० वर्षांत विविध बँकांचे एकूण ४६ एटीएम फोडून कोटय़वधी रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. त्यातील केवळ ६ गुन्हे उघड झाले आहेत. आतातर एटीएमचे यंत्रच चोरटे पळवून घेऊन जाऊ लागले आहेत. यामागे परप्रांतीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय वाटतो आहे.

या टोळीचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत, लवकरच टोळी जेरबंद होईल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक ईशु सिंधू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. एटीएमच्या लुटीत काही टोळ्या स्थानिक असल्या तरी एटीएम यंत्रच पळवून नेण्याचा गुन्हा करणारी टोळी परप्रांतीय असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. एटीएमच्या लुटीला आळा बसण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेच्या सुचनाही दिल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्य़ात विविध बँकांच्या शाखा फोडण्याचे सत्र सुरु झाले होते. ग्रामीण, दुर्गम भागात असणाऱ्या शाखा चोरटय़ांच्या टोळीकडून लक्ष्य केल्या गेल्या होत्या. क्वचित कोणत्या बँकेच्या शाखेपुढे सुरक्षा रक्षक तैनात केला जात होता. शिवाय शाखांच्या इमारतीही भक्कम नसत. आलार्म किंवा सीसीटीव्ही अशी यंत्रणा अस्तित्वातही नव्हती. त्यावेळी चोरटे बँकेच्या शाखातील तिजोरी गॅस कटरने फोडत. या लुटीच्या प्रयत्नात लाखो रुपयांच्या नोटा गॅस कटरने लागलेल्या आगीत भस्मसात होत. त्यामुळे चोरटय़ांनी बँकांची भिंतीत बसवलेली भरभक्कम तिजोरीच पळवण्याचे सत्र सुरु केले. तिजोरी फोडत बसण्याचा वेळ वाचवण्यासाठी ती उचलून किंवा वाहनातून दूरच्या शेतात नेली जाई, तेथे आरामात तिजोरी फोडून लूट केली जाई.

हीच बदललेली कार्यपद्धत आता बँकांच्या एटीएमसाठी चोरटय़ांकडून वापरली जात असल्याचा पोलीसांना संशय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गावर बँकांनी एटीएम मोठय़ा प्रमाणात सुरु केले. असे एटीएम लक्ष्य केले जात आहेत. सर्व एटीएमला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचे बँकांचे धोरण नाही, जेथे मोठी रक्कम आहे, तेथेच सुरक्षा रक्षक नियुक्त केला जातो. मात्र अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्थाही केली जात नाही. सीसीटीव्ही बसवला गेला तरी तो एटीएमच्या खोलीत. बाहेरील दोन्ही बाजूने, रस्त्याच्या दोन्ही बाजू उजेडात येतील, अशा पद्धतीने बसवले जात नाही, त्यामुळे चोरटय़ांची ओळख पटणे पोलीसांना अवघड जाते. अनेकदा चोरटे सीसीटीव्हीही फोडतात. अशी एटीएम लुटीची उदाहरणे जिल्ह्य़ात घडली आहेत. पूर्वी एटीएम फोडले जात होते, मात्र हे प्रयत्न अनेकदा असफल ठरत. आता एटीएम यंत्रेच उखडून पळवून नेण्याच्या व दूरच्या शेतात ते फोडून लूट केली जात असल्याच्या घटना घडत आहेत.

यामागे परप्रांतीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये, त्यापूर्वी नगरच्या एमआयडीसीच्या परिसरात झालेली घटना अशाच स्वरुपाची आहे. त्याचवेळी औरंगाबाद पुणे जिल्ह्य़ातही अशाच स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ten years 46 robbers looted the atm zws