"या सरकरला महाविकास आघाडीचं सरकार म्हणायचं नाही तर उद्यापासून या सरकारचे नाव जुम्मे के जुम्मे सरकार".अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली आहे. औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक होत भाजपाच्यावतीने जल आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत दानवेंनी राज्यसरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांवर निशाणा तसेच हे सरकार अमर-अकबर-अँथोनीचे सरकार आहे. यांच्यामध्ये कधीही नेते एकत्र बसत नाहीत. कोणताच निर्णय घेत नाही. यामुळे या राज्याचा एकही प्रश्न सुटला नाही आणि जे आपल्याला जमलं नाही, त्याच खापर केंद्रवार फोडतात.'' असा खोचक टोलाही दानवेंनी लगावला आहे. 'हे सरकार तुरुंगातून आणि घरातून कारभार चालवत आहेत. यांचे दोन मंत्री तुरुंगात आहेत आणि मुख्यमंत्री आपल्या घरात आहेत. करोना काळात राज्याचे विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांच्या दारी गेले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मात्र, मुख्यमंत्री घराबाहेर पडले नाहीत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' अशी घोषणा केली होती. १२ कोटी लोकं तुमच्या कुटुंबाचे आहेत. तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी नाही का, असा प्रश्नही दानवेंनी उपस्थित केला. शिवसेनेवर टीका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सोळाशे ऐंशी कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. त्यावेळी भाजपा-शिवसेनेची सत्ता होती पण आमची मते चोरीला गेली पण आता चोर सापडला आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या चोराला शिक्षा द्यायची असल्याचा टोलाही दानवेंनी लगावला.