विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद महिलेला देण्याची मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरपूर येथील श्री विठल रुक्मिणी मंदिर समिती स्थापन करण्याचा योग अखेर ४४ वर्षां नंतर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ३० जुन पूर्वी मंदिर समिती गठीत करा असे निर्देश राज्य सरकारल दिले आहेत.  त्यामुळे मंदिर समिती मध्ये आपली वर्णी लागावी म्हणून अनेक इच्छुक गुडघ्याला बािशग बांधून आहेत. या समितीचे अध्यक्षपद हे महिलेला देवून राज्य सरकाराने एक आदर्श निर्माण करावा अशी मागणी भारुड सम्राज्ञी  चंदाताई तिवाडी यांनी केली आहे. या समितीचे अध्यक्षा सह ११ सदस्यांची निवड राज्य सरकाराल ३० जून पूर्वी करावयाची आहे .

समतेच्या पताका खांद्यावर घेवून जाणाऱ्या वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे कायदा १९७३ मध्ये साली मंजूर झाला आहे. त्यानंतर १९८५  साली शासनाच्या आदेशानुसार बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा अस्थायी समिती स्थापन करण्यात आली. याच काळात बडवे – उत्पात यांनी या कायद्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. कालांतराने म्हणजेच १४ जानेवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बडवे,उप्त्पात आणि सेवाधारी यांचे हक्क संपुष्टात आल्याचा ऐतिहासिक निकाल  दिला आणि विठ्ठल बडवेमुक्त झाला. त्यानंतर सरकाराने तत्कालीन अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती स्थापन केली. ही समिती जून २०१५ साली बरखास्त करून जिल्हाधिकारी यांना सभापती नेमली ती आजतागायत आहे.

वास्तविक पाहता विठ्ठल रुक्मिणी मंदिरे १९७३ कायदाअन्वये मंदिर समिती गठीत करताना अध्यक्षा सह ११ सदस्य असावेत आशी तरतूद कायद्यात आहे. या समिती मध्ये एका अध्यक्षांसह  विधानसभा , विधानपरिषद सदस्य, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यातील प्रत्येकी एक , महिला सदस्य  आणि  पंढरपूरचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असतील आणि इतर  अशासकीय सदस्यांची नेमणूक सरकाराने करावी. या समिती मधील सदस्य हा वारकरी सांप्रदायाशी निगडीत असावा अशी अट कायद्यात आहे.मंदिरे कायादा १९७३ साली मंजूर झाला.  त्यामुळे तब्बल ४४ वर्षां नंतर कायद्याच्या चौकटीत हि समिती स्थापन करावी असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

महिलांना अध्यक्ष करा : चंदाताई तिवाडी

लाखो वैष्णवांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती स्थापन होत आहे हे नक्कीच चांगली बाब आहे. या मंदिर समितीचे अध्यक्ष पद हे महिलेला नियुक्त करावे. वारकरी सांप्रदाय मध्ये महिला – पुरुष समान मानले जाते. उच्च नीच मानले जात नाही. वारकरी हा एकमेकांच्या पाया पडतो. अशा या समितीवर महिलेची अध्यक्षपदी नियुक्त करावे आशी मागणी भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांनी केली आहे

समितीमध्ये राजकारणी नकोत : ह.भ.प. राणा महाराज वासकर

मंदिर समितीमध्ये निव्वळ राजकारणी सदस्यांची नेमणूक करू नये. वारकरी सांप्रदायातील रूढी आणि परंपरा यांची माहिती असणारे सदस्य नियुक्त करावेत. भाविकांना सोयी सुविधा द्याव्यात. राज्यात अनेक अभ्यासू आणि वारकर सांप्रदायाशी निगडीत सदस्य नियुक्त करावेत. अशी मागणी वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri vitthal rukmini temple committee 44 years later