मनुष्यबळ कमी असल्याने फेऱ्या वाढवण्यात अडचणी
मुंबई : टाळेबंदीपूर्वी दररोज ३१ ते ३२ लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या बेस्टला मनुष्यबळाअभावी आता चार ते पाच लाख प्रवाशांना सेवा देतानाही नाकीनऊ येत आहे. ८ जूनला बेस्टने ४.१९ लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर दुसऱ्या दिवशी यात ५४ हजार प्रवाशांची भर पडली. प्रवासी वाढत असले तरी मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी येत असून सामान्य प्रवाशांची ससेहोलपट सुरूच आहे.
टाळेबंदी शिथिल होताच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आरक्षित बसव्यतिरिक्त खासगी कार्यालयातील कर्मचारी, दुकानदार, प्लम्बर यांसह अन्य व्यक्तींनाही तिकीट काढून प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळे हळूहळू प्रवासी वाढत आहेत. पहिल्या दिवशी ४ लाख १९ हजार १५३ प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. बेस्टने ३५०० पैकी २,५०० बस चालवण्याचे नियोजन केले होते. मात्र गर्दीच्या वेळी केवळ २ हजार १३२ बसगाडय़ा धावल्या. ९ जूनला प्रवासी संख्येत आणखी वाढ झाली. या दिवशी ४ लाख ७३ हजार ६८० प्रवाशांनी प्रवास केला. मात्र प्रवाशांचे पहिल्या दिवशी झालेले हाल दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. मंगळवारीही केवळ २,३०० पर्यंत बस धावल्या. त्यानंतर बुधवारीही सकाळी गर्दीच्या वेळी तीच परिस्थिती होती. मर्यादित प्रवाशांमुळे भरून आलेली बस मधल्या थांब्यांवर थांबत नाही. त्यामुळे ताटकळत दुसऱ्या बसची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते.
बेस्टसमोरील अडचणी काय?
* करोनाची लागण झाल्याने काही चालक, वाहकांसह अन्य कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या भीतीने काही कर्मचारी कामावर येण्याचे कचरत आहेत. त्यांना ८ जूनपासून कर्तव्यावर येण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे बसगाडय़ा चालवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध होत नाही.
* साधारण ६०० बस या आरक्षित अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी दिल्या आहेत.
* बेस्टच्या ७५ मिनी बसचेही रुग्णवाहिकेत रूपांतर केले आहे.
उत्पन्न वाढले
८ जूनला बेस्टला तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून ४० लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. ९ जूनला हेच उत्पन्न ४५ लाख ५३ हजार २८ रुपयांपर्यंत पोहोचले.
डबलडेकर बस सुरू करण्याचा विचार
सध्या बेस्ट उपक्र माकडे १२० डबलडेकर बस आहेत. परंतु सध्या त्या वापरात नाहीत. प्रवाशांची गर्दी पाहता या बस दोन ते तीन दिवसांत पुन्हा सेवेत आणल्या जातील. कुर्ला स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे स्थानक याशिवाय मुंबई शहरातील काही भागांत धावणाऱ्या बस गर्दीच्या ठिकाणी चालवण्याचे नियोजन केले जात आहे.