सुट्टीच्या मोसमात गावी जाण्यासाठी तिकीट आरक्षित करताना रेल्वेप्रवाशांना अनेकदा गर्दीमुळे प्रतिक्षा यादीत ताटकळत राहण्याचा अनुभव येतो. त्यात अखेरच्याक्षणी गाडीत जागा न मिळाल्यास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रतिक्षा यादीची टांगती तलवार प्रवाशांसाठी नकोसा अनुभव असतो. मात्र, आता रेल्वेच्या प्रतिक्षा यादीत असणे तुमच्यासाठी सुखावह ठरू शकते. कारण, प्रतिक्षा यादीत असूनही तुम्हाला शेवटच्या क्षणी तिकीट न मिळाल्यास रेल्वेकडून तुम्हाला माफक दरांत हवाई प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. आयआरटीसीतर्फे हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कशी असेल ही योजना

प्रथम प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठीच्या प्रतिक्षा यादीत राहून तिकीट मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. हे तिकीट बुकींग प्रवासाच्या तीन दिवसआधी केलेले असावे. तरीही अखेरच्या क्षणी तिकीट न मिळालेले प्रवासी या योजनेसाठी पात्र ठरतील.

या प्रवाशांना आयआरटीसीकडून ते योजनेसाठी पात्र ठरल्याचा ई-मेल पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रवासी आयआरटीसीच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना जायच्या असलेल्या ठिकाणी हवाई सेवा उपलब्ध आहे की नाही याची माहिती घेऊ शकतात.

मात्र, प्रवाशांनी आधी नमूद केलले स्थानक किंवा आजुबाजुच्या परिसरासाठीच ही सुविधा उपलब्ध असेल. प्रवाशांना हा पर्याय मान्य असल्यास ते नेक्स्ट डे बटनावर क्लिक करून विमानाचे बुकींग करू शकतात.  

प्रवाशांना हवाई सेवेचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. तिकीटासाठी दिलेली रक्कम हे शुल्क भरून घेताना परस्पर वळती करता येणार नाही. त्यासाठी तिकीटाचे पैसे परत मिळवण्याच्या नेहमीच्या प्रक्रियेचा अवलंब केला जाईल.

शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सूचना. ही सर्व व्यवस्था आयत्यावेळी करण्यात आल्यामुळे संबंधित प्रवाशाचे विमान चुकल्यास रेल्वे जबाबदार राहणार नाही.  

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dropped from railway waiting list well irctc will now let you book last minute flight tickets