मुंबईमध्ये सोमवारी सकाळी वरुण राजाने दमदार हजेरी लावली आणि मुंबईकरांची तारांबळ उडाली. पावसाचे रौद्र रूप पाहून कार्यालयात वेळेवर पोहोचता येईल का, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. सकाळी नऊनंतर मात्र अनेक भागांत पावसाने अधूनमधून विश्रांती घेतली तरी रिमझिम सुरू होती. ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम यामुळे मुंबईत सुखद गारवा निर्माण झाला होता.
मुंबईत सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आणि सखल भाग जलमय होऊन रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे मुंबईकर धास्तावले होते. मात्र नऊनंतर पावसाचा जोर ओसरला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे मुंबईकर सावध होते. सायंकाळी पाऊस कोसळण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे काहींनी कार्यालयातून लवकरच काढता पाय घेतला.
सोमवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत शहरात १५.७ मि.मी., पूर्व उपनगरांत १५.६ मि.मी., तर पश्चिम उपनगरांमध्ये १५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पुढील ७२ तासांमध्ये मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
तलावक्षेत्रांत पावसाचा जोर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम आहे. सोमवारी सकाळी २४ तासांमध्ये मोडकसागरमध्ये ५९.६० मि.मी., तानसामध्ये ६६.६० मि.मी., विहारमध्ये १८४.६० मि.मी., तुळशीमध्ये १७६ मि.मी., अप्पर वैतरणामध्ये ३६.४० मि.मी., भातसामध्ये ४५ मि.मी., तर मध्य वैतरणामध्ये ३१ मि.मी. पावसाची नोंद झाली. परिणामी तलावक्षेत्रांतील जलसाठा ३,७३,२४४ दशलक्ष लिटरवर गेला आहे. सोमवारी दिवसभर सर्वच तलावांमध्ये पाऊस कोसळत होता. त्यामुळे  जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in mumbai