केंद्रातील विद्यमान मोदी सरकारने महात्मा गांधी यांच्या ‘राष्ट्रनिर्मितीसाठी खादी’ या मंत्राला ‘राष्ट्र परिवर्तनासाठी खादी’ असा मंत्र देऊन खादीला जगातील ६० देशांपर्यंत पोहचविले आहे. लवकरच खादी १५० देशांपर्यंत जाईल, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री गिरिराज सिंह यांनी येथे मंगळवारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून खादी उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी भरविण्यात आलेल्या ‘खादी फेस्ट २०१८’ प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी सिंह यांच्या हस्ते झाले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून (केव्हीआयसी) ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विले पार्ले (प.)येथे आयोजित हे प्रदर्शन १ नोव्हेंबपर्यंत सुरू राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच ‘खादीचा वापर करा’ असे आवाहन केलेले आहे, त्याला संपूर्ण देशामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे खादी व्यवसायात वाढ झालेली आहे, असे सिंह यांनी आवर्जून नमूद केले. गावांमध्ये खादी आणि गाय याचा चांगला उपयोग रोजगार निर्मितीसाठी होतो. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. भारताबाहेरील देशांमध्ये खादीसंबंधित बाजारपेठेला काबीज करण्यासाठी जगभर प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत, त्यामुळेसुद्धा खादीची मागणी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सिंह यांच्या सोबत केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना आणि केव्हीआयसीच्या मुख्याधिकारी प्रीता वर्मा उपस्थित होत्या. या महोत्सवात विविध राज्यांतील कुटिरोद्योगांतून निर्मित खादीचे कपडे, खादी सिल्कच्या साडय़ा, ड्रेस मटेरिअल, कुर्ते, जॅकेट्स, बेडशीट्स, कार्पेट्स यांबरोबरच रसायनमुक्त शाम्पू, मध व इतर घरगुती वस्तू आणि कला व कारागिरीच्या वस्तू उपलब्ध आहेत. थेट जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशभरात कार्यरत असलेल्या सुमारे १०० संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.

खादीचे आर्थिक यश!

वर्ष २०१५ ते २०१८ या काळामध्ये वार्षिक सरासरी ३६ टक्के वाढ नोंदवून खादी आणि ग्रोमोद्योग विभागाने सुमारे १४०.३४ लाख व्यक्तींसाठी रोजगारांची निर्मिती केल्याचा अध्यक्ष विनय कुमार यांचा दावा आहे. कारागिरांचे जीवनमान उंचावण्यासह त्यांच्या वेतनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तंत्रज्ञानातील सुधारणाही उत्पादन आणि विक्रीसाठी लाभदायक ठरत आहे. खादी उद्योगाची वार्षिक उलाढाल सध्या २,५०८ कोटी रुपयांवर असून, चालू आर्थिक वर्षांसाठी ३,२०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे केव्हीआयसीचे लक्ष्य असल्याचे विनय कुमार यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khadi and village industries