यवतमाळ : दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत असताना जिल्ह्याचे ‘पालक’ म्हणून जबाबदारी असलेले पालकमंत्री संजय राठोड अनेक तालुक्यांत फिरकलेही नाहीत. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीसह, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, सिंचनाची असुविधा, वन्यप्राण्यांचा हैदोस यामुळे त्रस्त आहेत. परंतु, पालकमंत्र्यांना आपली कैफियत ऐकण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अशोक धोबे, सुधाकर धोबे, प्रमोद खिरटकर, माणिक पांगुळ, संजय पारखी, नानाजी डाखरे, विजय धानोरकर , दौलत बदखल, सुरेंद्र काकडे, प्रमोद खंडाळकर, भास्कर दानखडे, संजय येरमे, नंदेश्वर आसुटकर आदी शेतकऱ्यांनी थेट मारेगाव पोलिसांत पालकमंत्री हरविल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीने शासन प्रशासनाचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : माकडाची शिकार करायला गेला अन् जीवाला मुकला! डीपीवर चढलेल्या बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

हेही वाचा – खासदार अशोक नेतेंच्या वाहनाला भीषण अपघात, सीटबेल्ट व एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले!

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे केवळ आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठीच उपलब्ध असतात. दिग्रस, दारव्हा, नेर या तीन तालुक्यातच त्यांचे सतत दौरे, कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने ते केवळ तीन तालुक्यांचे पालकमंत्री असल्याची उपरोधिक टीका त्यांच्यावर सातत्याने होत असते. वास्तविक यवतमाळ हा क्षेत्रफळ आणि तालुक्याच्या संख्येच्या दृष्टीने विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा आहे. मात्र पालकमंत्री राठोड यांचा सर्व ‘फोकस’ आपल्या मतदारसंघातच असल्याने उर्वरित जिल्ह्यात नागरिकांची ओरड सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister of yavatmal lost complaint of farmers to police nrp 78 ssb