बुलढाणा: होय! नजीकच्या काळात पाऊस झालाच नाही तर हजारो शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. शहरवासीच नव्हे तर परिसरातील १३ गावांतील ग्रामस्थांना सुद्धा टंचाईची झळ बसणार आहे. याचे कारण म्हणजे बुलढाणा शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने जिल्हा मुख्यालयावर पाणी टंचाईचे सावट असल्याचे चित्र आहे.
चिखली मार्गावरील येळगाव धरणातून बुलढाणा शहरासह परिसरातील १३ गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणातून दीड लाख नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र पावसाळा लांबल्याने अन धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने जलपातळीत घट झाली आहे. सध्या धरणात जेमतेम २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा दीड महिने पुरेल असा अंदाज आहे. पावसाळा लांबला तर मात्र पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा >>> नागपूरहून जयपूरला विमानाने जायचेय? आता चिंताच मिटली….!
पर्यायाची तयारी
ही बाब लक्षात घेऊन बुलढाणा नगर परिषदेने पर्यायी योजनेची तयारी चालविली आहे. मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनात खडकपूर्णा योजनेवरून शहराला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. बुलढाणा शहर व ४ गावे पाणी पुरवठा योजनेतून हा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.